नांदेड : परतीच्या पावसाचा पत्ता नाही, वातावरणात अद्याप उकाडा कायम आहे. असे असले तरी थंडीची चाहूल लागू लागली असून व्हायरल इन्फेक्शनची साथही आटोक्यात आली आहे. रुग्णालयातील गर्दी हटली असून डॉक्टरांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.
गतवर्षीच्या तुलनेने कमी पाऊस झाला. त्यामुळे यंदा पाणीटंचाई तीव्र होती. नेहमीप्रमाणे निम्मा पावसाळा कोरडाच गेला. जुलैच्या १९ तारखेपासून पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर ऑगस्ट अखेरपर्यंत नियमित पाऊस झाला. सप्टेंबरमध्ये अधूनमधून जोरदार पावसाने हजेरी लावली. अतिवृष्टीही याच काळात झाली. शेतीचे नुकसान झालेच, परंतु व्हायरल इन्फेक्शनची साथ जोरदार पसरली. शहरात मोठ्या प्रमाणात सुरू असलेली बांधकामे, रस्त्यांची कामे, तुंबलेल्या नाल्या आणि उघड्यावर उकरडे यामुळे डासांची पैदास प्रचंड झाली. परिणामी विविध प्रकारच्या तापांचे रुग्ण वाढले. डेंग्यूचा उपद्रव अचानक वाढला. विशेष म्हणजे स्वाईन फ्लू आणि चिकुन गुनिया या आजाराचे रुग्ण वाढू लागल्याने डॉक्टर गोंधळून गेले. रुग्णालयात गर्दी मावत नव्हती. सर्दी, ताप, खोकला, घसादुखी, अंगदुखी, सांधे आखडणे, या लक्षणांनी लोक त्रस्त झाले होते.
दि. २६ रोजी उत्तरा नक्षत्र संपून हस्ताला सुरुवात झाली. ऊन तापू लागले. ऑक्टोबर हिटची चर्चा सुरू झाली. संपूर्ण महिना अशा उकाड्याला तोंड द्यावे लागेल, असे वाटत असताना मंगळवारी (दि.८) दुपारनंतर अचानक वातावरण बदलले. आकाशात ढगांची गर्दी वाढली आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस बरसला. सुमारे तासभर पडलेल्या या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला.