

नायगाव : नायगाव तालुक्याची स्वतंत्र जिल्हा म्हणून निर्मिती व्हावी, या मागणीला पुन्हा एकदा जोर देण्यासाठी मराठवाडा जनता विकास परिषद, छत्रपती संभाजीनगरच्या नायगाव तालुका शाखेच्या वतीने १७ सप्टेंबर रोजी सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
नायगाव तालुका जिल्हा निर्मितीसाठी भौगोलिकदृष्ट्या सोयीचा असून, जनतेचा वेळ व पैसा वाचण्यासह प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान होण्यासाठी स्वतंत्र जिल्ह्याची आवश्यकता असल्याचे परिषदेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
नायगाव तालुक्यासह परिसरातील नागरिकांना प्रशासकीय कामांसाठी मोठ्या अंतराचा प्रवास करावा लागतो. जिल्हा निर्मिती झाल्यास नागरिकांच्या विविध प्रशासकीय अडचणी कमी होऊन विकासकामांना अधिक गती मिळेल, असा दावा परिषदेकडून करण्यात आला आहे.
जलसिंचनासह विविध विकासात्मक प्रश्नांवरही स्वतंत्र प्रशासकीय यंत्रणेमुळे अधिक परिणामकारकपणे काम करता येईल, अशी भूमिका पत्रात मांडण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर १७ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १ वाजता नायगाव येथील अंबिका मंगल कार्यालयात सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीसाठी नायगाव तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील सर्व प्रमुख राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसह खासदार, आमदार, माजी खासदार, माजी आमदार, लोकप्रतिनिधींना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नायगाव जिल्हा निर्मितीच्या मागणीसाठी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींची सहमती घेऊन महाराष्ट्र सरकारकडे ठोस मागणी मांडण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
नायगाव जिल्ह्यासाठी एकजुटीचे आवाहन
नायगाव जिल्हा निर्मितीच्या मागणीसाठी पक्षीय मतभेद बाजूला ठेवून सर्व लोकप्रतिनिधी, राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि नागरिकांनी एकत्र यावे, असे आवाहन मराठवाडा जनता विकास परिषदेच्या नायगाव तालुका शाखेने केले आहे.