

Mukhed Taluka Water Project
मुखेड : मुखेड तालुक्यात जलजीवन मिशनअंतर्गत १११ गावांमध्ये एक कोटी ते चार कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली होती. मागील तीन वर्षांत अनेक गावांमध्ये योजनांचा शुभारंभही करण्यात आला. मोठ्या प्रमाणावर निधी खर्च होऊनही बहुतांश कामे अद्याप अपूर्ण अवस्थेत असल्याने ग्रामस्थांना अपेक्षित लाभ मिळालेला नाही. पाणीपुरवठ्यासाठी मंजूर झालेला निधी अखेर वाया जाणार का, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.
आमदार डॉ. तुषार राठोड यांनी ग्रामीण भागात भविष्यात पाणीटंचाई निर्माण होऊ नये आणि तालुका टँकरमुक्त व्हावा, यासाठी मोठ्या आर्थिक तरतुदीसह १११ गावांतील जलजीवन कामांना मंजुरी मिळवून दिली होती. त्यानुसार तालुक्यात कामांना सुरुवातही झाली; मात्र सध्यस्थितीत बहुतांश कामे अर्धवट असल्याने येत्या उन्हाळ्यात नागरिकांना नियमित पाणीपुरवठा होणार की नाही, याबाबत अनिश्चितता आहे.
दरम्यान, एवढ्या मोठ्या आर्थिक उलाढालीच्या योजनेची जबाबदारी असलेले उपअभियंता कार्यालयाकडे फिरकत नसल्याची चर्चा आहे. संबंधित कार्यालयात केवळ एका कर्मचाऱ्यावर सर्व कामकाजाची जबाबदारी असल्याचे समोर येत आहे. त्या कर्मचाऱ्यानेही नांदेड येथे वास्तव्यास गेल्याने कार्यालयाकडे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार आहे. शासनाने पाच दिवसांचा आठवडा लागू करून कर्मचाऱ्यांना दिलासा दिला असला, तरी ठरलेल्या वेळेत उपस्थिती नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे.
या पार्श्वभूमीवर जलजीवन योजनेची रखडलेली कामे तातडीने पूर्ण करावीत तसेच संबंधित कार्यालयासाठी पूर्णवेळ उपअभियंत्याची नियुक्ती करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संजय येलमवाड यांनी केली आहे.