

विशेष प्रतिनिधी
नांदेड ः राज्यातील उष्णतेची लाट उत्तरोत्तर तीव्र होत चाललेली असताना मराठवाड्यातील दुसऱ्या क्रमांकाचे प्रमुख आणि ऐतिहासिक शहर हा तुरा मिरवणाऱ्या नांदेड शहरामध्ये दैनंदिन तापमानाची नोंद घेणारी अद्ययावत यंत्रणाच नसल्याची माहिती समोर आली असून त्यास मनपाची बेपर्वाई कारणीभूत ठरली आहे.
राज्यातील नागपूर, अमरावती, भुसावळ, अकोला, परभणी, नंदूरबार, जळगाव आदी ‘हॉट’ शहरांमध्ये रविवारी नोंदविल्या गेलेल्या तापमानाचे आकडे वृत्तपत्रांमध्ये वाचल्यानंतर मागील काळात नांदेड मनपाचे आयुक्त राहिलेले निवृत्त सनदी अधिकारी किरण कुरुंदकर यांनी सोमवारी नांदेडमधील मित्रांशी संपर्क साधून येथील उष्मा आणि तापमानाची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला; पण त्यानंतर चौकशी केली असता नांदेडमधील तापमानाची वस्तुनिष्ठ नोंद घेणारी यंत्रणा मागील तीन वर्षांपासून कार्यान्वित नसल्याचे समोर आले.
नांदेडचे रहिवासी असलेले छत्रपती संभाजीनगरच्या एमजीएम संस्थेतील विज्ञान केंद्राचे संचालक व हवामान तज्ज्ञ श्रीनिवास औंधकर यांच्याशी संपर्क साधला असता नांदेडमध्ये तापमानाची नोंद घेणारी यंत्रणा 2024 पासून कार्यान्वित नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
2014 साली नांदेड-वाघाळा मनपाच्या आर्थिक अनुदानातून एमजीएमच्या स्थानिक अभियांत्रिकी महाविद्यालयात नांदेडमधील हवामानाची सर्व परिमापके मोजणारी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली होती. ही यंत्रणा जागतिक हवामान परिमंडळाशीही जोडली गेली होती. त्याद्वारे हवामानविषयक संपूर्ण माहितीची नोंद घेतली जात होती. ही यंत्रणा साधारण तीन ते चार वर्षे कार्यरत राहील अशी हमी दिली गेली होती. आम्ही ती 2023 पर्यंत चालवली, असे औंधकर यांनी स्पष्ट केले.
9 वर्षे काम केल्यानंतर ही यंत्रणा बंद पडल्यानंतर एमजीएम संस्थेने ही यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी मनपाला सविस्तर प्रस्ताव दिला होता; पण तत्कालीन आयुक्त सुनील लहाने यांनी त्याबाबत कुठलाही निर्णय घेतला नाही. परिणामी नांदेडमधील यंत्रणा बंदच असल्याचे औंधकर यांनी सांगितले.
येथे मिळालेल्या माहितीनुसार यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी जेमतेम 3 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित होता; पण मनपाने तो उपलब्ध करून दिला नाही. नांदेड शहरातील मल्टीपर्पज हायस्कूल परिसरात तापमानाची नोंद घेणारी यंत्रणा होती; पण मागील एक वर्षापासून ते केंद्रही बंद असल्याचे सांगण्यात आले.
विद्यमान आयुक्त अनभिज्ञ!
हवामानाची नोंद घेणाऱ्या केंद्रासंदर्भात मनपाने दाखविलेल्या बेपर्वाईची माहिती समोर आल्यानंतर विद्यमान आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे यांच्याशी संपर्क साधला असता, मागील काळात मनपाच्या अर्थसहाय्यातून अशाप्रकारचे केंद्र सुरू होते व ते 2023मध्ये बंद पडले, ही बाब आजपर्यंत माझ्यासमोर आली नाही. आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून सर्व माहिती घेऊन पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.