

नरेंद्र येरावार
उमरी : तालुक्यातील कारला येथील दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले. ग्रामपंचायत कार्यालयाचे पूर्णतः दुर्लक्ष असून ग्रामसेवक बेपत्ता आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी ग्रामसेवक दाखवा आणि बक्षीस मिळवा असे जणू फर्मान काढले. ग्रामसेवक फोन उचलत नाहीत. त्यामुळे येथील नागरिकांना मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागत आहे. या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष घातले नाही तर गावकऱ्यांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते मोहनराव पवळे कार्लेकर यांच्यासह गावकऱ्यांनी दिला आहे.
ग्रामपंचायत अंतर्गत असणाऱ्या नवीन आबादी, बौद्ध विहार, आणि गावातील काही भागात पिण्याच्या पाण्याचे नळ असलेल्या ठिकाणीच नालीचे सांडपाणी साचून राहते. ते पाणी पूर्णतः दूषित असल्यामुळे दूषित घाण पाणी त्या पिण्याच्या पाण्यात मिसळत असल्याने नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.
कारला येथील नागरिकांनी अनेक वेळा ग्रामपंचायत सरपंच, ग्रामसेवक यांना सांगून सुद्धा याकडे दुर्लक्ष झाले आहे या संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांना अनेक वेळा कळवून देखील कुणाचीही या प्रकाराकडे लक्ष नसल्याने गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. राजकीय दृष्ट्या अत्यंत प्रतिष्ठेची आणि मोठी ग्रामपंचायत आहे. परंतु कोणाचेही लक्ष नाही.
पाण्याचा हौद बांधण्याच्या नावाखाली पैसे उचलण्यात आले. पाणी पुरवठ्याच्या योजनेअंतर्गत करण्यात आलेली कामे पूर्ण दाखवून कामे अर्धवट असताना देखील त्याची बिले उचलण्यात आली नियोजन शून्य कारभारामुळे कारला येथील नागरिकांना मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागत असल्याचा आरोप मोहनराव पवळे कार्लेकर यांनी केला आहे. यासंदर्भात ग्रामसेवकाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.