

संजीव कुळकर्णी
नांदेडः रेल्वे, रस्ते तसेच इतर वेगवेगळ्या विषयांच्या मागण्या करण्याच्या बाबतीत भाजपाच्या अशोक चव्हाण आणि डॉ.अजित गोपछडे या दोन राज्यसभा सदस्यांमध्ये चढाओढ दिसून आली आहे. त्यातून गेल्या अडीच वर्षांत नांदेड जिल्ह्याला काय मिळाले, हा तर संशोधनाचा विषय. पण आपल्या ‘स्थानिक विकास निधी’ कार्यक्रमांतून या दोन्ही खासदारांनी अनुक्रमे भोकर आणि देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघांचे हित जपण्याचा प्रयत्न केला आहे.
सन २०२४च्या फेब्रुवारी महिन्यात अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाची आमदारकी तसेच पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देऊन भाजपामध्ये प्रवेश केला होता. त्यांनतर या पक्षाने त्यांना महाराष्ट्रातून राज्यसभेवर पाठवत राजकीय कार्यक्षेत्राच्या बाबतीत त्यांना बढती दिली. त्यांच्यासोबत डॉ.गोपछडे यांनाही राज्यसभेवर पाठविण्यात आले.
नांदेडमधून एकाचवेळी दोघांना राज्यसभेची खासदारकी मिळण्याची ती पहिलीच वेळ होती; पण त्यानंतर तीन महिन्यांनी झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला त्याचा काहीही लाभ झाला नाही. पक्षाच्या उमेदवाराचा पराभव दारुण पराभव झाल्यामुळे राज्यातील भाजपाच्या नेत्यांना धक्काच बसला. नंतर सहा महिन्यांच्या आत नांदेड लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीचा प्रसंग उद्भवला. त्यातही भाजपाचा पराभव झाला होता. सुदैवाने भाजपा आणि मित्रपक्षांना विधानसभा निवडणुकीत मोठे यश मिळाल्यामुळे लोकसभा पोटनिवडणुकीतील पराभव झाकला गेला.
अशोक चव्हाण यांनी मागील काळात काँग्रेसतर्फे लोकसभेमध्ये प्रतिनिधित्व केले होते. भाजपाने त्यांना वरच्या सभागृहात म्हणजे राज्यसभेवर पाठविले, तर गोपछडे हे पहिल्यांदाच संसदेमध्ये गेले. गेल्या अडीच वर्षांत या दोघांनी स्वतंत्रपणे वेगवेगळ्या विषयांवर संबंधित मंत्र्यांच्या भेटी, आपल्या मागण्यांसंदर्भात त्यांना निवेदने देणे व त्याची प्रसिद्धी करणे यासाठी स्वतंत्र यंत्रणाच उभी केली; पण या प्रयत्नांमध्ये त्यांच्यातील चढाओढच ठळकपणे दिसून आली.
जिल्हाभर पसरलेल्या भाजपाच्या जुन्या-नव्या कार्यकर्त्यांना या दोघांच्याही खासदारकीचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष लाभ मिळालाच नसल्याचे सांगण्यात येेते. चव्हाण यांच्या कन्येला भाजपाने भोकर विधानसभा मतदारसंघात उमेदवारी दिली होती. पहिल्या प्रयत्नातच त्या आमदार झाल्या. त्या मतदारसंघाच्या लोकप्रतिनिधी या नात्याने त्या कार्यरत असल्या, तरी स्वतः खासदार चव्हाण यांनीही आपले लक्ष याच मतदारसंघाकडे केंद्रीत केले असल्याचे त्यांच्या स्थानिक विकास निधी कार्यक्रमातील कामांच्या शिफारशींवरून दिसून येते. दुसर्या बाजूला डॉ.गोपछडे यांनी आपल्या निधीतील बहुतांश हिस्सा देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघाकडेच वळविला असल्याची बाब समोर आली आहे.
खा.अशोक चव्हाण यांच्या खासदार विकास निधीतील प्रस्तावित ३२ कामांपैकी तब्बल ३० कामे भोकर विधानसभा मतदारसंघात होत आहेत. एकीकडे संपूर्ण जिल्हा माझ्या हातात द्या म्हणायचे आणि दुसरीकडे स्वतःच्या विकास निधीतून सुमारे ९५ टक्के विकास कामे केवळ आपल्या कन्येच्या मतदारसंघात करायचे, याचा अर्थ काय? खा.अशोक चव्हाण हे केवळ भोकरचे खासदार आहेत का, असा सवाल या निधी वाटपातून उपस्थित होतो. त्यामुळे त्यांचे नेतृत्व आता नांदेड जिल्ह्याऐवजी मुदखेड, अर्धापूर आणि भोकरपुरतेच मर्यादित राहिले आहे.
संदीपकुमार देशमुख बारडकर काँग्रेस कार्यकर्ता, बारड