

नायगाव : उन्हाच्या कडाक्यात नागरिक हैराण असताना महावितरणच्या निष्क्रिय आणि बेफिकीर कारभारामुळे नायगाव शहरात संतापाचा उद्रेक होत आहे. कोणतीही पूर्वसूचना नाही, वेळेचा ठावठिकाणा नाही – वीजपुरवठा अक्षरशः लपंडाव खेळत आहे. दिवस-रात्र कधीही वीज गायब होत असल्याने नागरिकांचे जीवन विस्कळीत झाले आहे.
घरात पंखे बंद, कुलर बंद, पाणीपुरवठा ठप्प – उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना अक्षरशः नरकयातना सहन कराव्या लागत आहेत. रात्रीच्या वेळी अचानक वीज खंडित होत असल्याने झोपेचा खोळंबा, तर दिवसा कामकाज ठप्प अशी दुहेरी कोंडी निर्माण झाली आहे.
“नेमकं पाणी मुरतंय कुठं?”
बेजबाबदार अधिकारी की निष्क्रिय कर्मचारी?
तांत्रिक बिघाड की देखभालीचा बोजवारा?
अपुरी यंत्रणा की वाढलेला ताण?
महावितरणच्या कारभारावरच संशयाचे सावट
नागरिकांनी वारंवार मांडलेल्या समस्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आहे. ट्रान्सफॉर्मरवर वाढलेला ताण, जळालेले फ्यूज, जीर्ण वीजतारा, लोंबकळणाऱ्या केबल्स, झाडांच्या फांद्यांचा स्पर्श – या सगळ्या धोकादायक बाबींकडे जाणीवपूर्वक डोळेझाक केली जात असल्याची भावना आहे. हेल्पलाईनवर फोन केला तर प्रतिसाद नाही, स्थानिक कार्यालयात विचारणा केली तर ठोस उत्तर नाही – नागरिकांना अक्षरशः वार्यावर सोडल्यासारखी अवस्था झाली आहे.
नागरिकांचा आक्रोश
“वीज कधी येईल याचा काहीच भरोसा नाही!”
“बिल वेळेवर भरतो, सेवा मात्र शून्य!”
“रात्री झोप नाही, दिवसा काम नाही!”
सहनशीलतेचा अंत; संताप उफाळला
व्यापारी वर्गालाही या अनियमित वीजपुरवठ्याचा मोठा फटका बसत आहे. फ्रीज, कोल्ड स्टोरेज, संगणक, इंटरनेट सेवा ठप्प होत असून व्यवसाय धोक्यात आला आहे. व्होल्टेजच्या चढ-उतारामुळे उपकरणे जळत असून नुकसान भरपाईबाबत मात्र महावितरण मौन बाळगत आहे.पूर्वी किरकोळ बिघाड तातडीने दुरुस्त होत होते; मात्र आता लहान समस्यांसाठीही तासनतास वीज गायब राहते, ही बाब गंभीर आहे.
तातडीच्या मागण्या
✔️ जुन्या वीज लाईनचे तातडीने नूतनीकरण
✔️ ट्रान्सफॉर्मर क्षमतेत वाढ
✔️ २४ तास तक्रार निवारण यंत्रणा
✔️ अतिरिक्त तांत्रिक पथके
✔️ दोषी अधिकारी-कर्मचार्यांवर कारवाई
नायगावकरांचा स्पष्ट इशारा
“महावितरणने आता सबबी सांगणे थांबवून कामाला लागावे. अन्यथा अंधारातून उठलेला हा संताप लवकरच आंदोलनात परिवर्तित होईल”