

नांदेड : शहरातील साफसफाईचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना नाहक त्रास देणाऱ्या बिनकामी कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावरून तत्काळ काढून टाकण्याच्या मागणीसाठी महापालिकेच्या कामगार कर्मचारी युनियनच्यावतीने शुक्रवारी (दि. २७) महापालिकेसमोर निदर्शने करण्यात आली. या आंदोलनामुळे शहरातील साफसफाईचे काम ठप्प झाले असून १०० दिवसांच्या कृती आराखड्याचा पहिल्याच दिवशी बोजवारा उडाल्याचे चित्र दिसून आले.
शहरात साफसफाई करण्याचे काम आर अँड बी इन्फ्रामार्फत सुरळीतपणे केले जात असताना महापालिकेने काही कर्मचाऱ्यांची भरती केली. पण हे नूतन कर्मचारी स्वतः साफसफाईचे काम न करता सुपरवायझर म्हणून कर्मचाऱ्यांना त्रास देत आहेत. यातील काही शिपाई तर काही संगणक चालक आहेत. तसेच प्रभाग दोन व १४ मध्ये मागील दोन दिवसांत प्रत्येकी एक महिला व पुरुष कामगाराची नियुक्ती केली गेली. हे दोन्ही नवीन कर्मचारी स्वतः गैरहजर असूनही कामावरील कर्मचाऱ्यांची गैरहजेरी टाकून मनःस्ताप देत आहेत. हा प्रकार सबळ पुराव्यानिशी निदर्शनास आणून दिल्यानंतर या दोन्ही कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात आले.
मनपाच्या निवडणुकीनंतर पुन्हा वरील दोन्ही कर्मचाऱ्यांना कामा घेतल्या गेले. आंदोलनात सहभागी झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या दोन दिवसांच्या रजा तर कामबंद असलेल्या दिवशी आंदोलन करणाऱ्यांचे वेतन दिले जाते. या भेदभावामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांमध्ये भीती पसरली आहे. त्यामुळे अशा बिनकामी व कर्मचाऱ्यांना नाहक त्रास देणाऱ्या त्या दोन कर्मचाऱ्यांना तत्काळ कमी करण्याच्या मागणीसाठी कामगारांनी शुक्रवारी सकाळपासून साफसफाई काम बंद केले.
नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका कामगार कर्मचारी युनियनचे अध्यक्ष कॉ. गणेश शिंगे यांच्या नेतृत्वाखाली दुपारी मनपासमोर साफसफाई कंत्राटी कामगारांच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात कॉ. गणेश शिंगे, प्रसेंजित अवताडे, शैलेश कांबळे, राजेश माने, संदीप पाईकराव, संजय कोकरे, सुमेध सूर्यवंशी, सुमेध कंधारे, राहुल शिंगे यांच्यासह घनकचरा ड्रेनेज व इतर विभागातील महिला व पुरुष कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
१०० दिवसांच्या कार्यक्रमाचा बोजवारा
महापालिकेने गुरुवारीच पत्रकार परिषद घेऊन पुढील शंभर दिवसांमध्ये करण्यात येणा-या नियोजित कार्यक्रमांची माहिती दिली होती. त्यात शहरातील स्वच्छता हा महत्वाचा आणि प्राधान्यक्रमाचा विषय होता. पण या आंदोलनाने पहिल्या दिवशी संकल्पनाम्याला खो बसला आहे. शहरात स्वच्छतेचे काम ठप्प पडल्याने सार्वजनिक आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे.