

Nanded News
मुखेड: मुखेड विधानसभा मतदारसंघातील कंधार तालुक्यातील काही प्रमुख गावांचे अतिवृष्टीमुळे रस्ते, पूल व मोऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, त्या भागातील दळणवळण सुलभ करण्यासाठी ४० कोटी रुपयांचा निधी द्यावा, अशी मागणी आमदार डॉ. तुषार राठोड यांनी नागपूर येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन केली आहे.
कंधार तालुक्यातील जिल्हा सीमा कुरुळा, पोखणी, गौळ-अंबुलगा, पेठवडज, गोणार-नारनाळी या रस्त्यांचे रुंदीकरण, पूल व मोरी बांधकामासाठी ४० कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली आहे.
याआधी आमदार राठोड यांनी रेणापूर-मुक्रमाबाद-देगलूर-खानापूर या मार्गासाठी निधी मिळावा म्हणून आग्रही भूमिका घेऊन पाठपुरावा करून आवश्यक निधी उपलब्ध करून घेतला होता. काही नेत्यांनी या कामाचे श्रेय ही घेण्याचा प्रयत्न केला होता.
त्या रस्त्याचे काम पूर्णत्वास आले असून त्याचा लोकार्पण सोहळा व वसंतनगर येथे उभारण्यात आलेल्या साईबाबा मंदिरात मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण होणार आहे, तर या धार्मिक सोहळ्यास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना मतदारसंघ भेटीचे निमंत्रण या वेळी आ. डॉ. तुषार राठोड यांनी दिले.
या वर्षी सुरु झालेल्या खरीप हंगामात उशिरा झालेल्या पेरण्या आणि नंतर झालेल्या दमदार पावसामुळे पिक परिस्थीती सुधारली होती, पण पिकाच्या शेवटच्या टप्यात पावसाचे पाणी अवश्यक असताना पावसाने दडी मारल्याने हाती आलेल्या पिकांना फटका बसला आहे. मागील ४० दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतक-यांची ऊभी पिके हातची गेली असून पिकाचे नुकसान होत आहे. शेतकऱ्यांच्या मनातील वेदना लक्षात घेऊन मराठवाड्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी आमदार राठोड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन केली आहे.