

'Mera Aadhaar Meri Pehchaan' Center Fails to Become Operational Even After District Collector's Letter
नांदेड, पुढारी वृत्तसेवा : 'मेरा आधार मेरी पहचान' हे अधिकृत केंद्र मुंबई शिवाय छ. संभाजीनगर व नागपूर येथे आहे. ते नांदेड येथेही असावे, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पत्राद्वारे मागणी केली आहे; परंतु ते अद्याप अप्राप्त आहे. परिणामी असंख्य दिव्यांगासह, ज्येष्ठ नागरिकांना पेन्शन व शासनाच्या विविध लाभाच्या योजनांपासून वंचित आहेत. याशिवाय विमानतळ, परदेशी प्रवास व तत्सम कारणांसाठीही त्यांना अनंत अडचणींचा सामना करावा लागतो आहे.
दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांची मनस्थिती आता मेरा आधार मेरी पहचान ऐवजी मेरा आधार मेरा दुष्मन अशी होऊ लागली आहे. कारण वय वर्ष ७० किंवा त्याहून अधिक वयाच्या नागरिकांना छ. संभाजीनगर किंवा नागपूर येथे आधार नोंदणीसाठी जाणे कोणत्याही दृष्टीकोनातून परवडणारे नाही. नांदेडमध्ये आधार नोंदणीसाठी विविध विभागांचे मिळून सुमारे १०८ केंद्र आहेत; पण, एखाद दुसरे केंद्र वगळता कोणीही ज्येष्ठ नागरिकांची नोंदणी करुन घेत नाही. कारण त्यांच्या बोटांचे ठसे व बुबुळांचे स्कॅन पुरेसे स्पष्ट आले नाही तर मोठ्या प्रमाणात आर्थिक दंड व केंद्र चालविण्याचा परवाना रद्द होऊ शकतो.
दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांपैकी अनेकजण सेवानिवृत्त शासकिय कर्मचारी आहेत. अनेकजण पेन्शन धारकांच्या विधवा किंवा अपंग वारस आहेत. याशिवाय इंदिरा गांधी राष्ट्रीय पेन्शन योजन-`चे लाभार्थी आहेत. आयुष्मान योजनेचा आधार घेण्याची वेळ सुद्धा अनेकजणांवर वारंवार येत असते; परंतु आधार ऑथेंटिकेशन बायोमियो ऑथेंटिकेशनसोबत सुरू झाल्यापासून अनेक ज्येष्ठ नागरिक हैराण आहेत.
त्यांचे आधार नोंदणी अर्ज रद्द होत आहेत. अशावेळी ज्येष्ठ नागरिक व त्यांच्या कुटुंबियांची अक्षरशः अवहेलना होत आहे. ही मंडळी वारंवार आधार अपडेट करण्यासाठी प्रयत्न करतात; परंतु दिव्यांग असल्याने व वृद्धत्वामुळे त्यांच्या बोटांचे ठसे व बुबुळांचे स्कॅन सुस्पष्ट येत नसल्याने ते अयशस्वी होतात. त्यामुळे त्यांचे आधार क्रमांक बँक खात्यांशी संलग्न होत नाहीत. परिणामी त्यांच्या हक्काचे पैसे बँकेत अडकून पडतात.
याबाबतीत जिल्हाधिकाऱ्यांनी जातीने पाठपुरावा करुन ज्येष्ठ नागरिकांचे आशीर्वाद घ्यावेत. अत्याधुनिक मशिन 'मेरा आधार मेरी पहचान' हे सर्वसामान्य आधार केंद्रापेक्षा वेगळ आहे. याठिकाणी अत्याधुनिक मशिन आहेत. जेणे करुन ज्या ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग किंवा ज्यांचे हाताच्या बोटांचे रेषा मिटल्या आहेत. ते सुस्पष्ट दिसत नाहीत. अशांसाठी हे केंद्र आहे. त्यामुळे मुंबई, नागपुर, छ. संभाजीनगर बरोबरच नांदेडसाठी हे केंद्र झाल्यास हजारों ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगाचे प्रश्न मार्गी लागतील.