

Massive sand extraction at night, government ban only on paper
नायगाव, (जि. नांदेड) पुढारी वृत्तसेवा : नायगाव तालुक्यातील गोदा वरी नदीपात्रात शासनाने घातलेली वाळू उपशावरची बंदी केवळ कागदापुरतीच मर्यादित राहिल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. प्रत्यक्षात मात्र लोहा तालुक्यातील काही वाळू माफिया दिवसाढवळ्या आणि रात्रीच्या अंधारात सक्शन पंप व बोटींच्या सहाय्याने हजारो ब्रास वाळूचा मोठ्या प्रमाणावर उपसा करीत आहेत.
दरम्यान, महसूल व पोलिस विभाग मात्र या बेकायदेशीर उपशाकडे आश्चर्यकारक मौन बाळगत असल्याने नागरिकांत तीव्र संतापाची लाट उसळली आहे. शासनाची बंदी आदेश फक्त दाखवण्यासाठीच लागू असल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे. बरबडा व टाकळी अंतरगाव परिसरात रोज १५ ते २० सक्शन जात पंपांच्या सहाय्याने वाळू उपसली जाते.
ही वाळू लोहा तालुक्यातील येळी, कामळज, कौडगाव येथे साठवून मोठ्या हायवा टिपरमधून मारतळा, कहाळा, मांजरम, गडगा, कौठा, गोणार मार्गे मुखेड व नायगाव परिसरात विक्रीसाठी पोहोचवली असल्याची माहिती समोर आली आहे. या सर्व प्रकारामुळे शासनाच्या महसुलाचे प्रचंड नुकसान होत असून, प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे वाळू माफियांना अक्षरशः मोकळे रान मिळाले आहे.
नागरिकांच्या तक्रारींना प्रतिसाद न मिळाल्याने संताप वाढत असून, जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांनी स्वतंत्र पथक नेमून संबंधित महसूल व पोलिस अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सर्वसामान्यांतून जोर धरू लागली आहे.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, महसूल विभागातील काही तलाठी, मंडळ अधिकारी तसेच लोहा तहसील कार्यालयातील संबंधित अधिकाऱ्यांची मूक संमती या अवैध धंद्यामागे असल्याची चर्चा जोरात आहे. या माफियांकडून दरमहा ठराविक 'हिस्सा' घेतला जातो, अशीही चर्चा सुरू असून तक्रारदारांना धमक्या देण्याचे प्रकार वाढले आहेत.