

किनवट : शेतकरी कर्जमाफीवरील जाचक अटी रद्द करण्याच्या मागणीवर चर्चा करण्यासाठी आयोजित करण्यात आलेली 'परदेशी समिती'ची बैठक ऐनवेळी रद्द करण्यात आल्याच्या निषेधार्थ अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने किनवट येथे निदर्शने करण्यात आली. कर्जमाफीवरील सर्व जाचक अटी तातडीने रद्द करून समितीची बैठक पुन्हा आयोजित करावी, तसेच राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
शेतकरी कर्जमाफीवरील जाचक अटी व शर्ती रद्द करण्यासाठी राज्यभर आंदोलन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित विषयावर चर्चा करण्यासाठी 'परदेशी समिती'सोबत बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र, ऐनवेळी राजकीय हस्तक्षेपामुळे ही बैठक रद्द करण्यात आल्याचा आरोप किसान सभेने केला असून, या निर्णयाचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.
या आंदोलनादरम्यान शेतकरी कर्जमाफीवरील जाचक अटी तत्काळ रद्द कराव्यात, परदेशी समितीसोबतची बैठक पुन्हा आयोजित करावी आणि राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊन सातबारा कोरा करावा, या मागण्यांचे निवेदन तहसीलदार डॉ. शारदा चोंडेकर यांना देण्यात आले.
यावेळी किसान सभेचे राज्य उपाध्यक्ष अर्जुन आडे, जनार्दन काळे, यशवंत राठोड, मनोज सलावार, रंगराव चव्हाण, विजय जाधव, मोहन जाधव, आडेलू बोनगीर, शेषेराव ढोले, सीताराम आडे, सुनील राठोड, सुनील केंद्रे, नंदू मोदुकवार, शेख फरीद बाबा, अंबर चव्हाण, झुमकीलाल आडे यांच्यासह किसान सभेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी सहभागी झाले. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशाराही किसान सभेच्या वतीने देण्यात आला.