

भोकर : शहरातील विविध भागांत झालेल्या अतिक्रमण धारकांना नोटिसा देऊनही अतिक्रमण काढून न घेतल्याने या अतिक्रमणावर प्रशासनाचा हातोडा चालवला गेला. यामुळे शहरातील रस्ते मोकळा श्वास घेत असून आता सदरील जागेवर पुन्हा अतिक्रमण होऊ नये, यासाठी काळजी घेणे आवश्यक आहे.
मागील पंधरा वर्षापूर्वी तत्कालीन उपविभागीय अधिकारी राजेंद्र खंदारे यांच्या मार्गदर्शनाखाली भोकर शहरातील अतिक्रमण हटविण्यात आले होते. तद्नंतर शहरातील विविध भागांत पुन्हा मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले. मध्यंतरी अतिक्रमण काढण्यासाठी हालचाली झाल्या होत्या. पण राजकीय हस्तक्षेपामुळे हे अतिक्रमण ‘जैसे थे’ राहिले.
शहरातील सर्व भागातील अतिक्रमण झाले असल्याने हे अतिक्रमण हाटविण्याची मागणी नागरिकांकडून केली जात होती. शेवटी पंचायत समिती, सार्वजनिक बांधकाम विभाग, वनविभागाने आपापल्या हद्दीतील अतिक्रमण धारकांना नोटीसा देऊन अतिक्रमण काढून घेण्याच्या सूचना दिल्या होत्या.
यामुळे काही व्यापाऱ्यांनी आपले अतिक्रमण स्वतः काढून घेतले. ज्यांनी काढून घेतले नाही त्या अतिक्रमणावर पोलीस बंदोबस्तात प्रशासनाने हातोडा टाकला असून अतिक्रमण मोठ्या प्रमाणात हटविण्यात आले आल्याने शहरातील रस्ते मोकळा श्वास घेऊ लागले आहेत.
दरम्यान, शहराच्या सर्वांगीण विकासासाठी अतिक्रमण हाटविण्यात आले असले तरी शहरातील छोटे-छोटे व्यवसाय करणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांच्यासाठी पर्यायी जागा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.