नांदेड: सद्यस्थितीत महायुती सरकारचा मनमानी कारभार सुरू आहे. इतर योजनांचे पैसे वळवून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी वळती केले असून, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत नसल्याने त्यांच्या शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. त्याचा निषेध करण्यासाठी हा चित्ररथ आम्ही महाराष्ट्रभर फिरवणार असून, त्याची सुरुवात आज (दि.११) नांदेडमधून झाली आहे, असे मत माजी मंत्री डी. पी. सावंत यांनी व्यक्त केले आहे.
नांदेड शहर व जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे राज्यातील भ्रष्ट सरकारची माहिती देणाऱ्या चित्ररथाच्या लोकपर्णप्रसंगी ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष बी.आर.कदम, हणमंत पाटील बेटमोगरेकर, शहराध्यक्ष अ. सत्तार अ. गफूर, आ. मोहन हंबर्डे, श्याम दरक, अनिल मोरे, डॉ. रेखा चव्हाण, राजेश पावडे, बालाजी चव्हाण, महेश देशमुख, प्रफुल्ल सावंत, अब्दुल गफार, अजिज कुरेशी, विठ्ठल पावडे, कुमार कुर्तडीकर, दिपूसिंग हुजूरीया, संजय शर्मा, शितल जोंधळे, बापूसाहेब पाटील, रागेजी सूर्यवंशी, अंबादास रातोळे, बाबूराव सोंडारे, विजय सोंडारे, शिवराज कांबळे, संजय वाघमारे, तुषार पोहरे, महेश शिंदे, अनिल सिरसाट, माधवराव पवळे, गणेश ढगे, धनंजय उमरेकर आदींसह प्रदेश पदाधिकारी, आजी-माजी लोकप्रतीनिधी व कार्यकर्ते उपस्थित होते.
माजी मंत्री डी.पी. सावंत म्हणाले की, महायुतीचे सरकार पाच वर्षांपासून लूट करत आहे. उद्योग गुजरात जाऊ दिले आहेत. परिणामी महाराष्ट्रात बेरोजगारीसह महागाई वाढलेली आहे. आज संजय गांधी निराधार योजनेचे पैसे लाभार्थ्यांना मिळत नाहीत. शिष्यवृत्तीचेही पैसे विद्यार्थ्यांना मिळत नसल्याने गोरगरीब विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. असे असतानाही, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू करून, पैसे वाटप केले जात आहे. एकंदरीतच, महायुतीचे सरकार मनमानी पद्धतीने कारभार करत असून, त्याचा निषोध म्हणून चित्रांसह हा चित्ररथ तयार केला आहे. त्याची सुरुवात नांदेडपासून झाली आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा चित्ररथ फिरणार असल्याचेही, डी.पी. सावंत यांनी स्पष्ट केले आहे.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला अपयश आले आहे. त्यामुळे त्यांच्या पायाखलची वाळू घसरलेली असून, मतदारांना लाच देण्याच्या हेतूने ते विविध योजनांची अंमलबजावणी करत आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही त्यातलाच प्रकार आहे. महायुतीच्या कारभाराचा प्रचार व प्रसार मतदारांपर्यंत पोचविण्यासाठी चित्ररथ संपूर्ण महाराष्ट्रात फिरवण्यात येणार असून, त्याची सुरुवात नांदेडमधून झाली आहे.