

विठ्ठल कटके
रेणापूर : केंद्र शासनाने तुरीचा आठ हजार प्रति हेक्टर हमी भाव जाहीर केला आहे. परंतु बाजारात हमी भावापेक्षा 700 रुपये अधिक भाव असल्यामुळे एकाही शेतकऱ्यांने रेणापूरच्या आधारभूत हमी भाव खरेदी केंद्रांवर तुरीची ऑनलाईन नोंदणी केलेली नाही. मागील वर्षीही केवळ पाचच शेतकऱ्यांची नोंदणी झाली होती. याही वर्षी खरेदी केंद्रांवर शुकशुकाट दिसून येत आहे.
राज्यातील तुर उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र सरकारने तुर खरेदीचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार 20 जानेवारी ते 20 फेब्रुवारी पर्यंत शेतकऱ्यांना तुरीची ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे.
तीन जानेवारीला खुल्या बाजारात तुरीला साडे सहा ते साडेसात हजार रुपये प्रति क्विंटल भाव होता त्यानंतर भावामध्ये चढ उतार होत गेली सध्या (3 फेब्रुवारी ) खुल्या बाजारात तुरीला प्रति क्विंटल साडे आठ हजार ते आठ हजार सहाशे पन्नास रुपये भाव मिळत आहे.
हमी दराच्या तुलनेत प्रति क्विंटल साडे सहाशे रूपये अधिक मिळत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी शासनाच्या हमी भाव केंद्राकडे पाठ फिरवली आहे. यंदा सोयाबीनची कसर तुरीवर भरून निघेल अशी आशा शेतकऱ्यांना होती. त्याप्रमाणे बाजारात तुरीचे भाव वाढल्याने शेतकऱ्यांच्या पदरी कांही अंशी तरी पैसे पडतांना दिसत आहे . सरकारने सोयाबीनची खरेदी बंद करून तुरीच्या खरेदीचे आदेश दिले. 7 हजार 550 ते 8 हजार रुपये प्रति क्विंटल हमी भाव जाहिर केला.
20 जानेवारीपासून ऑनलाईन नोंदणीची प्रक्रिया सुरू झाली. ती 20 फेब्रवारी पर्यंत सुरू राहणार आहे. रेणापूर तालुक्यात तुरीचे क्षेत्र 3 हजार 682 हेक्टर आहे. या वर्षी 2 हजार 323 हेक्टर क्षेत्रावर तुरीची पेरणी झाली आहे.
नवी तुर बाजारात दाखल होत आहे. बाजारात असेच दर राहिले तर शासनाच्या हमी भाव केंद्रावर तुर खरेदी होण्याची शक्यता दिसत नाही. केंद्र शासनाने राज्यात 3 . 37 लाख मेट्रीक टन तुर खरेदीला मान्यता दिली आहे परंतु हमीभावापेक्षा बाजारात तुरीला साडे सहाशे रुपये प्रति क्विंटल वाढ मिळत असल्याने शासनाची हि उद्दीष्टपूर्ती होईल की नाही याबाबत साशंकता आहे.
शेतमालाच्या प्रति क्विंटल भावांमध्ये झालेले चढ उतार
तूर - 7500 - 8650, चना - 5 200 - 5900 , मुग - 7,000 - 7 ,100 , उडीद - 6500 - 7 000 , सोयाबीन - 4 950 - 5800 ज्वारी - 3,400 - 4, 300 , करडई - 9 100 - 9600 , राजमा - 8500 - 9 ,000