

रेणापूर : रेणा मध्यम प्रकल्पातून रेणापूर, पानगाव, पट्टीवडगाव व बीटरगाव या नळयोजनांना पाणीपुरवठा केला जातो. गेल्या पाच वर्षांपासून या योजनांची एक कोटी ७२ लाख ८१ हजार रुपयांची पाणीपट्टी भरलेली नाही त्यामुळे जलसंपदा विभागाने सदरील गावांचा पाणीपुरवठा बंद केला आहे. संपूर्ण पाणीपट्टी भरल्याशिवाय पाणीपुरवठा सुरुळीत केला जाणार नाही असे शाखा अभियंता श्रीनाथ कुलकर्णी यांनी सांगितले.
रेणापूर मध्यम प्रकल्पातून रेणापूर नगर पंचायत, बीटरगाव पाच खेडी, पानगाव दहा खेडी व पट्टीवडगाव नऊ खेडी या गावांना पाणीपुरवठा केला जातो. जलसंपदा विभागाकडुन दरवर्षी पाणीपुरवठा केलेल्या बिलाची (पाणीपट्टी) मागणी केली जाते. परंतु गेल्या पाच वर्षांपासून या गावानी पाणीपट्टी भरलेली नाही.
बिटरगाव ५ खेडी योजनेची २६ लाख २६ हजार, रेणापूर नगर पंचायतकडे ४० लाक्ष ५६ हजार, पानगाव १० खेडी योजनेची १ कोटी १ लाख ५ हजार तर पट्टीवडगाव ९ खेडी योजनेची ४ लाख ४९ हजार अशी एकूण १ कोटी ७२ लाख ८१ हजार रुपयांची थकीत पाणीपट्टी येणे बाकी असल्याने ही बाकी वसूल करण्याकरिता जलसंपदा विभागामार्फत पाणी पुरवठा खंडित करण्यात आला आहे.
वरील योजनांना थकीत पाणीपट्टी भरावी म्हणून जलसंपदा विभागाने तीन वेळा नोटिसा बजावल्या होत्या मात्र त्यांनी बाकी भरली नाही त्यामुळेलघु पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता डी. डी. मुंगे, शाखा अभियंता एस. एस कुलकर्णी, आरीफ शेख व डहाळे यांनी उपरोक्त योजनांचा पाणी पुरवठा बंद करून पंप हाऊसना टाळे ठोकून सील लावले आहे.
पाणीपट्टी भरल्याशिवाय या योजनांचा पाणीपुरवठा केला जाणार नाही असे शाखा अभियंता श्रीनाथ कुलकर्णी यांनी सांगितले. वरील योजनांचा पाणीपुरवठा बंद झाल्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे, त्यासाठी तातडीने थकबाकी भरावी व पाणीप-रवठा सुरळीत सुरू करावा अशी मागणी केली जात आहे.