

अहमदपूर : रिपब्लिकन पक्ष हा कोणत्या एका जाती धर्माचा पक्ष नसून हा सर्व जातीधर्माचा पक्ष असून लवकरच या पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी केले. रिपाईच्या वतीने आयोजित जाहीर सभा व सत्कार सोहळ्यात ते बोलत होते.
शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री बाळासाहेब जाधव तर व्यासपीठावर माजी आमदार बब्रुवान खंदाडे, नगराध्यक्ष ड. स्वप्नील व्हत्ते, रिपाईचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब कांबळे, दिलीपराव देशमुख, शिवानंद हेंगणे, त्र्यंबक गुट्टे, अशोक केंद्रे शिवाजीराव देशमुख, चंद्रकांत चिकटे, मिलिंद महालिंगे, श्रीकांत बनसोडे निवृत्ती कांबळे, प्रदीप कांबळे, अरुण वाघंबर आदींसह अनेकांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना आठवले म्हणाले की अहमदपूर तालुक्यात दलित पँथरची शाखा काढण्यासाठी गावोगावी फिरलो आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार पँथरच्या माध्यमातून रुजविण्याचे काम करीत आलो आहे.
अहमदपूरशी माझे जुने नाते असून अरुण वाघंबर यांचे वडील भाऊसाहेब वाघंबर पँथरच्या काळात माझ्यापाठीशी उभा असलेला वाघ होते. नामांतराचा लढा, गायरान जमिनीचा प्रश्न, आंदोलने, मोर्चा यासाठी त्यांनी आपणास मोठी साथ दिल्याचे आठवले म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजितदादा पवार हा राजकारणातला चमकता तारा होता. मुख्यमंत्र्यांनी अजितदादा पवार यांच्या अपघाताची चौकशी व्हावी या उद्देशाने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र पाठवले आहे असेही आठवले म्हणाले. यावेळी गायक साजन बेंद्रे आणि विशाल चव्हाण यांचा भीम गीतांचा कार्यक्रम झाला.