

लातूर : महावितरण महानगर पालिका प्रशासनाने वारंवार सूचना देऊनही रोहित्रा जवळ कचरा सातत्याने टाकला जातो. मागील वर्षी रोहित्राजवळ कचरा जाळल्याने रोहित्र जळून वीजपुरवठा खंडित होण्याबरोबरच लाखो रुपयांचे नुकसान झाल्याच्या घटना घडल्या आहेत. वाढत जाणारी उष्णता लक्षात घेता वीज यंत्रणा सुरक्षित राहण्यासाठी व अखंडित वीजपुरवठासाठी वीज यंत्रणेजवळ कचरा टाकू अथवा जाळू नये असे आवाहन महावितरणने केले आहे.
शहरातील अनेक भागांत नागरिक रस्त्यावर कचरा टाकत आहेत. मोकळ्या जागी, मुख्य रस्त्याच्या कडेला तसेच वीजपुरवठा करणाऱ्या रोहित्रांच्या जवळील कचरा जाळण्याचे प्रमाण कमी होत नाही. त्यामुळे रोहित्राला आग लागण्याच्या घटना घडत असतात. रोहित्राजवळील कचरा जाळल्यामुळे आग लागल्याने वीजपुरवठा खंडित होण्याबरोबर लाखो रुपयांचे नुकसान दरवर्षी महावितरणला सोसावे लागते.
प्रसंगी रोहित्रातील ऑईल लीकेज झाल्यास कचरा पेटण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. नागरिकांनी उघड्यावर असलेल्या वीज यंत्रणेला धोका निर्माण होईल अशा ठिकाणी कचरा टाकू नये किंवा साठवलेला कचरा जाळू नये. अशा घटनांतून वीज यंत्रणेला आग लागल्यास अग्निशमन दला सोबतच महावितरणच्या १९१२ किंवा १९१२०, १८००-२१२-३४३५ आणि १८००-२३३-३४३५ या टोल फ्री क्रमांकांवर किंवा नजीकच्या महावितरण कार्यालयाला त्याची सूचना देण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.
"रोहित्राजवळील कचरा जाळल्याने वीजयंत्रणेला मोठा फटका बसतो. पर्यायाने वीजग्राहकांनाही याची झळ सहन करावी लागते. रोहित्रे उन्हाच्या तीव्रतेने गरम झालेले असतात. अशावेळी रोहित्राजवळ कचरा जाळल्यास त्याची धग रोहित्रास बसून रोहित्राचे तापमान वाढल्याने प्रसंगी रोहित्रास आग लागून रोहित्र जळून जाते. परिणामी वीजपुरवठा खंडित होतो. त्याचबरोबर रोहित्राचा स्फोट झाल्यास गंभीर अपघातही होण्याची शक्यता असते. त्यामुळे वीजग्राहकांनी सजग राहून रोहित्राजवळ कचरा टाकू नये अथवा कचरा टाकून जाळणाऱ्यास मज्जाव करावा."
- अरविंद बुलबुले, मुख्य अभियंता, महावितरण लातूर परिमंडळ