

लातूर : जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि 10 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून याबद्दल जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत याची विस्ताराने माहिती दिली.
या निवडणुकांसाठी 1 हजार 753 केंद्र असणार असून मतदारांची संख्या14 लाख 99 हजार 190 अशी असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. निवडणूक कार्यक्रमानुसार, मतदार यादी 1 जुलै 2025 पर्यंत ग्राह्य धरण्यात येणार आहे. निवडणूक प्रक्रियेची अधिकृत सूचना 16 जानेवारी रोजी प्रसिद्ध केली जाईल. नामनिर्देशनपत्र 16 ते 21 जानेवारी दरम्यान सादर काने लागतील.
नामनिर्देशनपत्रांची छाननी 22 जानेवारी रोजी केली जाईल. उमेदवारी मागे घेण्याची अंतिम तारीख 23, 24 आणि 27 जानेवारी 2026 असणार आहे. उमेदवारांची यादी 27 जानेवारीरोजी प्रसिद्ध केली जाईल आणि त्याच दिवशी चिन्हांचे वाटप करण्यात येईल. मतदान 5 फेब्रुवारी रोजी तर मतमोजणी 7 फेब्रुवारी रोजी होईल. जिल्हा परिषदसाठी एकूण 59 गट असून, यात अनुसूचितजातीसाठी 12, अनुसूचित जमातीसाठी 2, ना.मा.प्र. साठी 15 आणि सर्वसाधारण 30 जागा राखीव करण्यात आल्या आहेत. 11 पंचायत समित्यांसाठी 118 गण असून त्यात लातूर पंचायत समितीसाठी 20, औसा 18, रेणापूर 8, चाकूर 10,अहमदपूर 12, उदगीर 14, जळकोट 6, निलंगा 20, शिरुर अनंतपाळ 4 व देवणी पंचायत समिती 6 असे आरक्षण आहे.
आदर्श आचारसंहितेचे काटोकोर पालन व्हावे यासाठी विविध 183 पथके गठीत करण्यात आली असून निवडणुकांचे काम दिल्या वेळेत योग्य रित्या पूर्ण व्हावे यासाठी समित्याही गठीत करण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. पोलिस अधिक्षक अमोल तांबे यांनी सुरक्षा व आदर्श आचार संहिता पालनाच्या पार्श्वभूमिवर पोलिस प्रशासनाने केलेल्या तयारीची विस्ताराने माहिती दिली. उपलब्ध मनुष्यबळ पुरेसेनसल्याने लागणारे मनुष्यबळ मागविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, उपजिल्हाधिकारी सायली ठाकूर व गणेश पवार यांची उपस्थिती होती.
तालुकानिहाय मतदान केंद्र
लातूर 300,औसा 250, रेणापूर 131,चाकूर 151, अहमदपूर 200, उदगीर 210, जळकोट 84 , निलंगा : 268 , शिरूर अनंतपाळ: 76, देवणी 83, याशिवाय जिल्ह्यात विशेष मतदान केंद्रांतर्गत 13 महिला संचलित केंद्रे, 11 युवा संचलित केंद्रे व 6 दिव्यांग संचलित केंद्रे राहणार आहेत.
14 हजार 365 दुबार मतदार आढळले असून त्यांची नावे चिन्हांकीत करण्यात आली आहेत. त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांना कोठेही एकाचवेळी मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. विशेष म्हणजे गत निवडणुकीतील मतदारसंख्येत यावेळी 19 हजार 900 मतदार वाढले असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.