

लातूर : रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करून नागरिकांचे जीवित सुरक्षित ठेवण्यासाठी लातूर जिल्हा पोलिसांनी १४ ते १९ जुलै या कालावधीत विशेष वाहतूक अंमलबजावणी मोहीम राबवून हेल्मेट न घालता दुचाकी चालविणारे तसेच सीट बेल्टचा वापर न करणाऱ्या चारचाकी चालकांसह एकूण २६२ वाहनचालकांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई केली.
पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक नियंत्रण शाखा आणि जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांच्या संयुक्त विद्यमाने ही मोहीम राबविण्यात आली. मोहिमेदरम्यान वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांची तपासणी करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. रस्ते अपघातांमध्ये होणारे मृत्यू आणि गंभीर दुखापती टाळण्यासाठी हेल्मेट व सीट बेल्टचा वापर अत्यंत महत्त्वाचा असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
अपघाताच्या वेळी ही सुरक्षा साधने चालक आणि प्रवाशांसाठी प्रभावी संरक्षण ठरतात. त्यामुळे प्रत्येक वाहनचालकाने दर्जेदार हेल्मेट व सीट बेल्टचा वापर करणे आवश्यक असल्याचे आवाहन करण्यात आले आहे.
लातूर जिल्हा पोलीस दलाकडून अशा विशेष वाहतूक मोहिमा यापुढेही नियमितपणे राबविण्यात येणार असून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई सुरूच राहणार आहे. वाहतूक शिस्त निर्माण करून अपघातमुक्त लातूर घडविणे हेच या मोहिमेचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे पोलिसांनी सांगितले.
नागरिकांसाठी आवाहन
दुचाकी चालविताना नेहमी दर्जेदार हेल्मेटचा वापर करावा. चारचाकी वाहनातील चालकासह पुढील व मागील आसनावरील प्रवाशांनीसीट बेल्ट लावावा. वेगमर्यादेचे पालन करावे, मद्यपान करून वाहन चालवू नये आणि वाहन चालविताना मोबाईलचा वापर टाळावा. सर्व वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करून स्वतःचा आणि इतरांचा जीव सुरक्षित ठेवावा.