

लातूर : अपघातातील जीवितहानी कमी करण्यासाठी लातूर पोलिसांनी १ सप्टेंबरपासून हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी सुरू केली आहे. त्यानुसार विनाहेल्मेट दुचाकीस्वारांवर कारवाई सुरू असून, १३ सप्टेंबर रोजी एकाच दिवशी ९१९ केसेस करण्यात आल्या. तर १ सप्टेंबरपासून आतापर्यंत एकूण १० हजार ९७७ कारवाया करण्यात आल्या आहेत.
पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली मार्चपासून हेल्मेट वापराबाबत जनजागृती करण्यात येत आहे. प्रसारमाध्यमे, विविध उपक्रम आणि आवाहनांच्या माध्यमातून हेल्मेटचे महत्त्व नागरिकांना पटवून देण्यात आले. मात्र, अपेक्षित प्रमाणात हेल्मेट वापर वाढला नसल्याने सक्तीची अंमलबजावणी करण्यात आली.
हेल्मेट सक्तीचा उद्देश दंड वसूल करणे नसून दुचाकी अपघातांमध्ये होणारी जीवितहानी कमी करणे हा आहे. त्यामुळे नागरिकांनी प्रत्येक प्रवासात दर्जेदार हेल्मेटचा वापर करून सुरक्षित वाहतुकीच्या उपक्रमाला सहकार्य करावे, असे आवाहन लातूर पोलिसांनी केले आहे.