

रेणापूर : लातूर-अंबाजोगाई राष्ट्रीय महामार्गावरील नेहरू नगर तांडा येथे जेसीबीच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला. ही घटना रविवारी (दि.१३) सायंकाळी ७.१५ च्या सुमारास घडली. राजू मलिक शेख (वय ३६, रा. राजे नगर रेणापूर) असे मृताचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, राजू शेख हा लातूर येथे बांधकाम मिस्त्री म्हणून काम करीत होता. काम आटोपून तो रेणापूरकडे दुचाकी (क्रं एम एच १३ सीएन १६९६) वरून येत होता. तो नेहरूनगर तांडा जवळ आला असता बाजूच्या शेतात काम करून (क्रं. एम एच २४ बी आर ८३४४) जेसीबीने त्याच्या दुचाकीला समोरून धडक दिली. या अपघातात राजू शेख याचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर अंधाराचा फायदा घेऊन जेसीबी चालक वाहनांसह पसार झाला. अपघातानंतर ग्रामस्थांसह नातेवाईकांनी घटनास्थळी गर्दी केली. घटनेची माहिती मिळताच रेणापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी अपघातातील आरोपीला जोपर्यंत पोलिस अटक करत नाहीत, तोपर्यंत मृतदेह घटनास्थळावरून उचलू देणार नाही, असा पवित्रा नातेवाईकांनी घेतला. पोलिसांनी समजूत काढल्यानंतर दोन तासांनी मृतदेह उचलण्यात आला. पोलिसांनी जेसीबी ताब्यात घेतला असून आरोपीचा शोध सुरू आहे.