

औसा : औसा-तुळजापूर महामार्गावर औसा शहराजवळ एका हॉटेल जवळ शुक्रवार (दि.6 ) रात्री 11 च्या सुमारास कार, ट्रक व कंटेनर या तीन वाहनांचा विचित्र भीषण अपघात झाला. वेगवान कारने ट्रक आणि कंटेनरला जोराची धडक दिली. कारमधील चौघांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी आहेत.
सांगली येथील काशिनाथ जाधव हे आपल्या बीएमडब्ल्यू कारने (एमएच 04 ईजी 7500) काही कामानिमित्त लातूरला आले होती. रात्री शिवली येथे जेवण केल्यानंतर सहकाऱ्याला सोडण्यासाठी ही कार औशाकडे येत असताना औशानजीक एका हॉटेल समोर पुढे चाललेल्या लाकडाने भरलेल्या ट्रकला (एमएच 25 यू 0522) आणि एका कंटेनरला (एमएच 12 एफसी 7642) पाठीमागून जोरदार धडक दिली. धडक एवढी भीषण होती की, लाकडी ट्रक शंभर फूट पुढे जाऊन उलटला, तर कार पूर्णपणे चक्काचूर होऊन रस्त्यालगतच्या खड्यात कोसळली. हा अपघात खूपच भयानक होता महामार्गावर रक्ताचा सडा आणि मृताच्या अवयवांचा अक्षरशः चेंदामेंदा झाला.
या अपघातात मृत्यूमुखी पडलेले तिघेजण हे औसा तालुक्यातील बोरगाव (न.) येथील रहिवासी आहेत. चालक धनराज काशिनाथ जाधव (49, रा. सांगली), आबासाहेब आप्पासाहेब साळुंके (36), शुभम शेषेराव पाटील (26), किसन रामलिंग साळुंके (49, तिघेही रा. बोरगाव) यांचा जागीच मृत्यू झाला, तर अपघातात गंभीर जखमी जयहिंद विश्वास जाधव (30, रा. औसा) आणि विनायक श्रीकांत हालदर (28, रा. सांगली) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या लातूर येथे उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि औसा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य केले. ट्रक मधील लाकडे रस्त्यावर पडल्याने काही काळ या मार्गांवरील वाहतुकीही विस्कळीत झाली होती. घटनेची माहिती मिळताच औसा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य केले औशाचे डीवायएसपी कुमार चौधरी, पोलिस निरीक्षक रेवण डमाले, फौजदार भाऊसाहेब माळवदकर यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
बोरगाववर शोककळा
औसा ते तुळजापूर महामार्गावर रात्री झालेल्या भीषण विचित्र अपघातात बोरगावातील तिघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेने बोरगाववर शोककळा पसरली आहे. औसा पोलीस अधिकचा तपास करत आहेत.