जळकोट : मागील ऑगष्ट महिन्यात जळकोट तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. अतिवृष्टीने अनेक पिकाचे नुकसान झाले आहे. काल ३१ ऑगष्टपासून पुन्हा तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. आज सकाळपासूनही तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस सुरू आहे. अर्थात, सप्टेंबर महिन्याही ढगफुटी घेऊन उजाडला आहे.
अतिवृष्टीच्या कायम मुक्कामाने तालुक्यात सतत झोडपून काढत असून पिके आणि जमिनीचे नुकसान निरंतर सुरुच आहे. पुलावरून पाणी वाहत असल्याने मरसांगवी ते अतनूरचा रस्ता आज पुन्हा एकदा बंद झाला आहे. तालुक्यातील अनेक रस्त्यांवरील पूल पाण्यात बुडाले असून विविध गावांची वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे नागरिकांना गावाबाहेर जाणे- येणे कठीण झाले आहे. तर शेतक-यांना शेताला जा-ये करणे मुश्किल झाले आहे.
पाऊस एकदा सुरू झाला की, तासनतास उघडायचे नाव घेत नाही. त्यामुळे रस्ते, शेत शिवार सर्वत्र पाणीच पाणी होत आहे. मुसळधार पावसामुळे जिथे तिथे तळ्यांचे स्वरुप येत आहे. गावांना जोडणारे रस्ते असो की शेताकडे जाणारे रस्ते असो ते पुरामुळे बंद पडत आहेत. त्यामुळे कुठेही संपर्क यंत्रणा ठप्प होत आहे. मरसांगवीहून अतनूरला जाणारा रस्ता आज पुन्हा पुलावरून पाणी वाहत असल्याने बंद झाला आहे.
शेतात चरण्यासाठी गुरे सोडून घरी आल्यावर परत शेताकडे जाईपर्यंत पुलावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतातील गुरांची चिंता भेडसावत आहे. त्यामुळे काही शेतकरी जीव धोक्यात घालून थेट पुलावरून वाहणाऱ्या पाण्यातून प्रवास करीत जनावरे आणण्याचा धोकादायक प्रयत्न करीत आहेत. मरसांगवी येथील बहुतांश शेतक-यांची शेती ही अतनूर रस्त्यावर आहे. या रस्त्यावर पुलावर नेहमीच पाणी येत असून ही दररोज पाण्यात बुडालेल्या पुलावरून शेताला जा- ये करीत आहेत.
आज रोजी मरसांगवी येथील शेतकरी इमाम खुशाल चंदा यांनी मरसांगवी - अतनूर रस्त्याच्या पुलावरून कमरे एवढे पाणी वाहत असतानाही आपला जीव धोक्यात घालून शेतातील म्हैस आणली. पुलावरील पाण्यातून ते अनेकदा पाण्यात पडले पण स्वत :ला कसेबसे सावरत ते घरी पोहोचले. शेतकऱ्यांना जीव धोक्यात घालून शेताला जा- ये करावी लागत असल्याने कधी कोणाला जीव गमवावा लागेल हे काही सांगता येत नाही.
तालुक्यातील शेत शिवारांना तळ्याचे स्वरुप येत असून पिके वाहून जाणे, जमीन खरडून जाणे असे प्रकार घडत आहेत. त्यामुळे शेतक-यांचे दररोज नुकसान होत आहे. तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटत आहे. त्यामुळे शेतक-यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी, खराब झालेले रस्ते दुरुस्त करावेत तसेच कमी उंची असलेल्या पुलांची उंची वाढवावी अशी मागणी जळकोट तालुक्यातून करण्यात आली आहे.