

लातूर : केंद्र सरकारने कामगारांचे हक्क आणि अधिकार असलेले 29 कामगार कायदे रद्द करून नवीन चार कायदे केलेत. हे नवीन चार कायदे कामगारांना व कर्मचाऱ्यांना गुलाम बनवणारे असल्याने ते त्वरित परत घ्यावेत. या व अन्य विविध मागण्यासाठी 12 फेब्रुवारी रोजी कामगार संघटनानी देशभर संप पुकारला होता.
त्याचाच भाग म्हणून अखिल महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेच्या वतीने आज सकाळी 12 वाजता साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौक ते जुने जिल्हाधिकारी कार्यालय, शिवाजी चौक लातूर येथे मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात लातूर जिल्ह्यातील कष्टकरी, श्रमिक व कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या मोर्चाचे नेतृत्व राजकुमार होळीकर यांनी केले.
मोदी सरकारने घरेलू कामगार, बांधकाम कामगार, माथाडी कामगार, कंत्राटी कामगार यांच्या हक्क आणि अधिकारांचे रद्द केलेले 29 कामगार कायदे पुन्हा प्रस्थापित करून त्याची अंमलबजावणी करण्यात यावी, कामाच्या तासांत वाढ करू नये, कायम स्वरूपी बारमाही कामामध्ये कंत्राटी कामगार पद्धत बंद करण्यात यावी, सरकारी, निमसरकारी, सार्वजनिक उद्योग, सेवा उद्योग, नगरपालिका, महानगर पालीका अशा ठिकाणी अस्थाई वर्षानुवर्षे काम करणाऱ्या कंत्राटी, हंगामी, रोजदारी, मानधनावरील कामगाराना, कर्मचाऱ्यांना विनाअट कायम करण्यात यावे, महाराष्ट्र जनसुरक्षा कायदा रद्द करण्यात यावा, नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या पाल्याना देण्यात येणाऱ्या शैक्षणिक सहाय्य योजनेत कोणताही बदल न करता त्या पूर्ववत चालू ठेवावे आदी मागण्या मोर्चाद्वारे करण्यात आल्या.
लातूर शहरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक येथून अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला अभिवादन करून मोर्चाला सुरुवात झाली. मोदी सरकारच्या विरोधात घोषणा देत जुने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकला. राजकुमार होळीकर, सुधीर देशमुख, बसवंतआपा उबाळे, प्रा. सुधीर अनवले, शफी शेख यांची भाषणे झाली. जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले.