

उमरगा, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील सुंदरवाडी विठ्ठल मंदिरमाळ येथील भाविकांवर काळाने घाला घातला आहे. देव दर्शनासाठी गेलेले चार भाविकांच्या रिक्षाला ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातात चौघांचा मृत्यू झाला. तर ३ गंभीररित्या जखमी झाले आहेत. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. प्रेमीला सुनिल जगदाळे (वय ३२), सुनिल जगदाळे, अनुसया महादेव जगदाळे, पुजा विजय जाधव, असे अपघातात मृत्यू झालेल्या भाविकांची नावे आहेत.
अधिकची माहिती अशी की, श्रावण सोमवार निमित्त कर्नाटकातील श्रीक्षेत्र अमृतकुंड येथे दर्शन करुन परतत होते. रिक्षा महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर मन्नाळी येथे पोहचली असता ट्रकने रिक्षाला जोराची धडक दिली. सोमवारी (दि.२८) दुपारी अडीचच्या सुमारास हा अपघात झाला असून मृतांमध्ये तिघे उमरगा तालुक्यातील सुंदरवाडी (विठ्ठल मंदिर माळ) येथील तर एक महाविद्यालयीन मुलगी शहापूर (ता.तुळजापूर) येथील रहिवाशी आहेत.
बसवकल्याणच्या उपविभागीय पोलीस अधिकारी शिवमसू राजपूत, मंडळ पोलीस निरीक्षक सुवर्णा मलशेट्टी, पोलीस हवालदार राजशेखर रेड्डी, मल्लीकार्जुन सलगरे यांनी अपघातस्थळी जात जखमींना उमरग्यातील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. डॉ. प्रभाकर बिचकाटे यांनी जखमींवर प्राथमिक उपचार केले. या अपघातात दोन लहान मुले बचावले आहेत. लक्ष्मी सुनील जगदाळे (८) वर्षे तर अस्मिता शीवराम जगदाळे (१०) हे बचावले असून त्याना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.