मुखेड; पुढारी वृत्तसेवा : नांदेड जिल्ह्यातील मुखेड येथे बुधवारी ( दि. ६) रात्री पुरात अडकलेल्या ३५ शेतकर्यांची प्रशासनाने जेसीबीच्या सहाय्याने सुटका केली.
मुखेड शहरासह तालुक्यातील काही भागात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली. यात वीज कोसळून दोन जनावरे दगावली असून काही नागरिकांनाही सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. तालुक्यातील पाळा, जाहुर, अंबुलगा या परिसरात मोठ्या शंभर मिलिमीटर पेक्षा जास्त पावसाची नोंद आहे. अचानक झालेल्या जोरदार पावसामुळे पाळा येथील एका नाल्यामध्ये अडकलेल्या नागरिकांना जेसीबीच्या सहाय्याने सुरक्षित बाहेर काढण्यात आले, अशी माहिती तहसीलदार राजेश जाधव यांनी दिली. या पावसामुळे परिसरातील घरांमध्ये पाणी शिरले असून, शेतीचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील आठ सर्कलमध्ये अतिवृष्टी झाल्याची नोंद आहे.