

जालना : दक्षिण मध्य रेल्वेच्या वतीने प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता आणि प्रवाशांची सोय व्हावी यासाठी तिरुपती ते नगरसोल दरम्यान विशेष रेल्वेगाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या विशेष गाडीमुळे जालना, परभणी, नांदेड, पूर्णा आणि छत्रपती संभाजीनगर परिसरातील प्रवाशांना व भाविकांना दक्षिण भारतात जाणे अत्यंत सुकर होणार आहे. गाडी क्रमांक ०७४२७ तिरुपती- नगरसोल ही रविवार, दि. २३ रोजी भल्या पहाटे ०३:३० (रविवार) तिरुपती येथून सुटेल तर सोमवारी दुसऱ्या दिवशी सकाळी ८ नगरसोल येथे पोहचेल.
गाडी क्रमांक ०७४२८ नगरसोल तिरुपती ही बुधवार दि. २६ रोजी दुपारी अडीच वाजता सुटणार असून, गुरूवार सायंकाळी पावने सात वाजेच्या सुमारास तिरुपती येथे पोहचेल. या विशेष गाड्यांच्या एकूण २ फेऱ्या चालवल्या जाणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने एसी २ टीयर, एसी ३ टीयर, स्लीपर क्लास आणि जनरल सेकंड क्लास कोचची सुविधा आहे. प्रवाशांनी या विशेष सेवेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे. अशी माहिती दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी ए. श्रीधर यांनी दिली आहे
मार्गावरील प्रमुख स्थानके ही विशेष रेल्वे
दोन्ही दिशेने प्रवास करताना रेणिगुंटा, राजमपेट, कडपा, येर्रागुंटला, ताडिपत्री, गुत्ती, गुंटकल, आदोनी, मन्त्रालयम रोड, रायचूर, कृष्णा, यादगीर, तांदूर, विकाराबाद, लिंगमपल्ली, सिकंदराबाद, निजामाबाद, बासर, मुदखेड, नांदेड, पूर्णा, परभणी, जालना आणि छत्रपती संभाजीनगर या प्रमुख रेल्वे स्थानकांवर थांबणार आहे.