

The school bell rang; the premises resounded with the chatter of students
जालना, पुढारी वृत्तसेवा : उन्हाळ्याच्या दीर्घ सुट्टीनंतर जालना जिल्ह्यातील जिल्हा परिषद तसेच खासगी शाळांचे दरवाजे सोमवारी पुन्हा विद्यार्थ्यांसाठी खुले झाले. अनेक दिवस शांत असलेला शाळांचा परिसर विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने आणि उत्साहाने पुन्हा जिवंत झाल्याचे चित्र सर्वत्र पहायला मिळाले.
नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांमध्ये विशेष उत्साह दिसून आला. नव्या वर्गात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे अनेक शाळांमध्ये पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. काही शाळांमध्ये स्वागत कार्यक्रम, प्रार्थना आणि परिचय सत्रांचे आयोजन करण्यात आले होते. नवीन गणवेश, दप्तरे आणि पुस्तकांसह शाळेत दाखल झालेल्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.
दरम्यान, शाळा सुरू होताच वह्या, पाठ्यपुस्तके, दप्तरे आणि इतर शालेय साहित्य खरेदीसाठी पालकांनी बाजारपेठेकडे धाव घेतली. जिल्ह्यातील वह्या-पुस्तक विक्रीच्या दुकानांमध्ये सकाळपासूनच पालक आणि विद्यार्थ्यांची मोठी गर्दी दिसून आली. शालेय साहित्य खरेदीसाठी अनेक ठिकाणी रांगा लागल्याचेही पहायला मिळाले.
यंदा वह्या, पाठ्यपुस्तके, दप्तरे तसेच इतर शालेय साहित्याच्या किमतीत १० ते २० टक्क्यांनी वाढ झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. वाढत्या किमतींमुळे पालकांच्या खर्चात भर पडली असली तरी मुलांच्या शिक्षणासाठी आवश्यक साहित्य खरेदी करण्यास त्यांनी प्राधान्य दिले.
शैक्षणिक खर्चात वाढ झाल्याने काही पालकांनी चिंता व्यक्त केली. दरम्यान, जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शाळेतर्फे पाठ्यपुस्तके, शालेय गणवेश व आवश्यक साहित्य देण्यात आले.
शिक्षकांकडून विद्यार्थ्यांचे स्वागत
पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांनी मित्र-मैत्रिणींशी भेट घेत वर्गात उपस्थिती लावली. शिक्षकांनीही विद्यार्थ्यांचे स्वागत करून नवीन शैक्षणिक वर्षासाठी मार्गदर्शन केले. नव्या शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभामुळे शाळा, विद्यार्थी आणि पालकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून पुढील शैक्षणिक उपक्रमांना वेग येणार आहे.