

The first installment of sugarcane received has been deposited in the farmers' accounts.
शहागड, पुढारी वृत्तसेवा गळीत हंगाम २०२५-२६ करिता गळीतास येणाऱ्या उसास पहिला हप्ता दोन हजार आठशे रुपये प्रति मे.टन देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. त्यानुसार संबंधित ऊस पुरवठादार शेतकऱ्यांच्या खात्यावर सदरची रक्कम वर्ग करण्यात आली आहे. धोरणाप्रमाणे पुढील हप्ते देण्यात येतील. अशी ग्वाही कारखान्याचे मार्गदर्शक माजी मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखान्यात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. माजी मंत्री टोपे म्हणाले की, कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखान्याचे कार्यक्षेत्रात गळीत हंगाम २०२५-२६ करीता एकूण ३५ हजार ३५८ हेक्टर ऊस क्षेत्राची नोंद झाली आहे. यापासून ३० लाख मे. टन ऊस गळीतास उपलब्ध होईल, असा अंदाज आहे. युनिट नं. १ व २ कडील प्रत्यक्ष ऊस गळीतास दिनांक ०५/११/२०२५ रोजी सुरुवात झाली.
दिनांक ०६/१२/२०२५ अखेर दोन्ही युनिट मिळून ३ लाख ३० हजार मे. टन उसाचे गळीत झाले आहे. तसेच युनिट नं. १ कडील डिस्टिलरीमध्ये ४९ लाख ७२ हजार बल्क लिटर्स अल्कोहोल व ४२ लाख ५५ हजार बल्क लिटर्स इथेनॉलचे उत्पादन झाले आहे.
सहवीज निर्मिती प्रकल्पामधून ६९ लाख ३२ हजार युनिट वीज निर्मिती झाली असून ४२ लाख ३८ हजार युनिट वीज महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीस विक्री केली आहे. युनिट नं.२ (सागर) तीर्थपुरीकडील डिस्टिलरीमध्ये २१ लाख ९७ हजार बल्क लिटर्स अल्कोहोल व १८ लाख ८ हजार बल्क लिटर्स इथेनॉलचे उत्पादन झाले आहे.
कारखाना कार्यक्षेत्रातील सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला ऊस कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ कारखान्याकडे गळीतास पाठवून सहकार्य करावे, असे आवाहन कारखान्याचे मार्गदर्शक माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केले. यावेळी संचालक मंडळ उपस्थित होते.
आर्थिक आधार मिळाला
पहिला हप्ता रु. २८०० प्रति मे. टन प्रमाणे ऊसाच्या बिलाची रक्कम खात्यावर जमा झाल्याने ऊसउत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळाला आहे. यामुळे ऊसउत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण परसले असून अनेक ऊसउत्पादकांनी कारखान्याचे मार्गदर्शक राजेश टोपे व संचालक मंडळाचे आभार व्यक्त केले आहेत.