

Suspension of Gram Sevaks and Agricultural Assistants proposed; The extent of the scam will increase
जालना, पुढारी वृत्तसेवा : जालना जिल्ह्यात आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या भरपाईत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा करण्यात आला आहे. या प्रकरणातील दोषी ३८ ग्रामसेवक व २० कृषी सहायकांवर लवकरच कारवाईचा होणार आहे.
जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार २०२२ ते २०२४ या काळात नैसर्गिक आपत्तींमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या भरपाई रकमेत करण्यात आलेल्या घोटाळ्यात प्राथमिक लेखापरीक्षणात जालना जिल्ह्यातील अंबड आणि घनसावंगी तहसीलमध्ये कार्यरत असलेल्या २६ अधिकाऱ्यांनी ३४.९७कोटी रुपयांची अनियमितता केल्याचे समोर आले होते.
सरकारी अनुदान वाटपात घोटाळा केल्याप्रकरणी दोषी आढळून आलेल्या तलाठी आणि महसूल खात्यातील अन्य कर्मचाऱ्यांवर जिल्हा प्रशासनाने निलंबनाची कारवाई केली आहे. आता या घोटाळ्यात सहभाग असल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्याने जिल्ह्यातील विशेषतः अंबड,घनसावंगी तालुक्यातील ३८ ग्रामपंचायत अधिकारी आणि २० कृषी सहायकांवर देखील निलंबनाची कारवाई प्रस्तावित करण्यात आल्याचे सरकारी सूत्रांनी सांगितले.
जिल्हा प्रशासनाने याबाबतचा प्रस्ताव जालना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे. या प्रकरणात आता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व कृषी अधिकारी हे लवकरच कारवाई करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
जिल्ह्यातील अनुदान घोटाळ्यात ग्रामसेवक व कृषी सहायकांनतर दोषी आढळलेले नायब तहसीलदार व तहसीलदारांवरही आगामी काही दिवसांत कारवाई होण्याची शक्यता आहे. आ. बबनराव लोणीकर यांनी या प्रकरणात दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.