

आन्वा ः उन्हाळ्याच्या दिवसात तापमानात मोठी वाढ होत असून, त्याचा परिणाम डोळ्यांवर जाणवत आहे. उष्ण वारे, धूळ आणि प्रदूषणामुळे डोळ्यांची आग होणे, जळजळ, लालसरपणा, तसेच कोरडेपणा यांसारख्या समस्या वाढत आहेत. विशेषतः दुपारच्या वेळी बाहेर पडणाऱ्या नागरिकांना या त्रासाचा अधिक सामना करावा लागत आहे.
डोळ्यांमध्ये साचलेली धूळ आणि घाण काढण्यासाठी वेळोवेळी स्वच्छ पाण्याने डोळे धुणे आवश्यक आहे. सनग्लासेस (गॉगल्स) वापरल्याने सूर्याच्या तीव्र किरणांपासून डोळ्यांचे संरक्षण होते. धूळ आणि गरम वाऱ्याचा त्रासही कमी होतो. मात्र, सनग्लासेस वापरताना ते दर्जेदार असणे महत्त्वाचे आहे.
उन्हाळ्यात डोळ्यांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. सतत जळजळ, लालसरपणा किंवा पाणी येणे, यांसारख्या तक्रारी असल्यास दुर्लक्ष करू नये. त्वरित नेत्र तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा आणि स्वतःहून औषधी वापरणे टाळावे.
उन्हाळ्यात शरीरासोबत डोळ्यांनाही पुरेशी विश्रांती मिळणे गरजेचे असते. दररोज किमान 7 ते 8 तासांची झोप घेतल्यास डोळ्यांचा थकवा कमी होतो. अपुरी झोप असल्यास डोळ्यांत जळजळ, कोरडेपणा आणि लालसरपणा वाढू शकतो. शक्यतो दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे टाळा, डोळ्यांची उघड-झाप करत राहणेही महत्त्वाचे आहे.
काळजी घ्या
उन्हात फिरताना नागरिकांनी डोळ्याची विशेष काळजी घ्यावी. बाहेर जातांनी डोळ्याना चष्मा वापरा. तसेच थंड पाण्याने धूत जा. दुपारी उन्हाचा पारा जास्त असल्याने घराबाहेर जाणे टाळावे. आवश्यक असल्यास काळजी घ्यावी.