

पारध : पुढारी वृत्तसेवा
भोकरदन तालुक्यातील पारध येथे मागील काही दिक्सांपासून दिवसाढवळ्या बेसुमार डेरेदार वृक्षांची कत्तल केली जात आहे. यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. वनविभागाच्या दुर्लक्षामुळे पर्यावरण प्रेमीतुन संताप व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे शिवारात तसेच रस्त्यावर जागोजागी तोडलेल्या वृक्षांचे बुंधे आणि अवशेष पडलेले दिसून येतात.
पारध परिसर हा वीस ते पंचवीस गावांचा मिळुन विस्तारलेला आहे. एकेकाळी या परिसराची ओळख तालुक्यात वनसंपदेची पंढरी म्हणून होती. या भागात निसर्गाने भरभरुन वनसंपदा दिली आहे. त्यामुळे या परिसरावर निसर्ग देखील नेहमी मेहरबान असायचा. परंतु गेल्या गेल्या पाच ते सहा वर्षांपासून पारध परिसरातील पिंपळगाव रेणुकाई, वरुड, रेलगाव, कोसगाव, अवघडराव सावंगी, मोहळाई, लेहा, शेलुद, जळगाव सपकाळ, कोठा कोळी, करजगाव, कल्याणी, आडगांव, दहिगांव, आन्वा आदीभागात मोठमोठ्या लिंब, बाभुळ, वड, पिपळ, चंदन, साग, निलगरी, काटशेवरी आदी झाडांची राजरोसपणे कत्तल सुरू आहे. भरदिवसा अत्याधुनिक औजारांच्या साहाय्याने वृक्षतोड केली जात आहे. त्यामुळे घनदाट जंगले ओसाड होत आहेत. मागील काही दिवसांपासून परिसरात अवैध वृक्ष तोडीने डोके वर काढले आहे. दिवसेंदिवस पडत असलेला दुष्काळ व निसर्गाचा समतोल यामुळे बिघडत चालला आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देउन बेसुमार वृक्षतोड थांबवण्याची मागणी पर्यावरण प्रेमींकडून व्यक्त केली जात आहे.
बिघडत असताना वृक्ष संवर्धन करणे गरजेचे आहे. या परिसरात गेल्या तीस वर्षापुर्वी घनदाट वृक्ष होते. मात्र परिसरात सद्यस्थितीत रानकसायांनी उच्छाद मांडला आहे. शेतकऱ्यानी झाडे विकण्यास विरोध केला तर हे रानकसाई रानीची पाळत ठेवत त्या शेतकऱ्याचे झाड देखील परस्पर लांबवत असल्याचे प्रकार या भागात घडत असल्याने शेतकऱ्यांच्या मनात एक दहशत निर्माण झाली आहे. या भागातुन रोज भरदिवसा ट्रॅक्टर, ट्रकद्वारे लाकडे शहरी भागाकडे वाहून नेली जातात. एकाकडे शासन दरवर्षी झाडे लावण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करीत आहे तर दुसरीकडे महाकाय वृक्षांची तोड केली जात आहे.