

जाफराबाद ः राज्यातील शेतकरी, कामगार, कष्टकरी, महिला, विद्यार्थी यांच्यासह सर्वसामान्य नागरिकांचे जीवनमान उंचावावे आणि त्यांनी आनंदाने जीवन जगावे, यासाठी केंद्र व राज्य शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.
जाफराबाद येथे विविध विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, आ. बबनराव लोणीकर, आ. नारायण कुचे, आ. संतोष दानवे, माजी आ. विलास खरात, संतोष लोखंडे, आशा पांडे, महापौर वंदना मगरे, उपमहापौर राजेश राऊत, नगराध्यक्ष कविता वाकडे, भास्कर दानवे, सभापती गोविंदराव पंडित, नाना भागिले, नगरसेवक सुरेश दिवटे, दीपक वाकडे, विजय परिहर, अनिल बोर्डे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना मंत्री भोसले म्हणाले, “मला केंद्रात जाण्याची इच्छा नसून राज्याचा सर्वांगीण विकास करण्याचा ध्यास आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून मिळालेल्या संधीचा प्रामाणिकपणे उपयोग करून सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार असून अपूर्ण विकासकामे पूर्णत्वास नेण्याची ग्वाही देतो.”
आ. संतोष दानवे यांनी प्रास्ताविकात केंद्र व राज्य सरकार हे शेतकरी व सर्वसामान्यांचे सरकार असल्याचे सांगत, मागील 12 वर्षांत विविध जनकल्याणकारी योजना प्रभावीपणे राबविल्याचे नमूद केले. मतदारसंघातील मागासलेपण दूर करण्यासाठी रस्ते, वीज, पाणी, हर घर नळ यासह इतर योजना केल्याचे आ. दानवे यांनी सांगितले.
राज्य सुजलाम् सुफलाम् करायचे
राज्याची अर्थव्यवस्था मजबूत करण्यावर शासनाचा विशेष भर असून शेतीला पाणीपुरवठा करून राज्य ‘सुजलाम सुफलाम’ करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. शेतकरी व सर्वसामान्य हेच शासनाचे केंद्रबिंदू असून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजना प्रभावीपणे राबविण्यात येत असल्याचे मंत्री भोसले यांनी सांगितले.