वडीगोद्री : मंत्री शंभूराज देसाई यांच्यावर आमचा विश्वास असून याआधी समाजाची कामे त्यांनी मार्गी लावली आहेत. त्यामुळेच आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला आहे. एक महिन्याच्या मुदतीत आम्ही दिलेल्या व्याख्येप्रमाणे सगे-सोयरेचा प्रश्न शंभूराज देसाई निकाली लावतील, असा विश्वास मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला. ते अंतरवाली सराटी येथे पत्रकारांशी संवाद साधताना बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, बॉम्बे, हैद्राबाद आणि सातारा गॅझेटचा प्रश्न ही सरकार निकाली काढेल. मराठा समाजाला दिलेलं आश्वासन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि शंभूराज देसाई पूर्ण करतील, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. ५ लाख रुपयांच्या नुकसानीच्या आतील गुन्हे मागे घेता येऊ शकतात. मात्र त्यापेक्षा अधिक झालेले नुकसानीच्या गुन्ह्याबाबत गुन्हे मागे घेता येणार नाही, या शंभुराज देसाई यांच्या वक्तव्याबाबत विचारले असता पोलिसांनी नाहक अनेकांना गुंतवलं आहे, असे जरांगे म्हणाले. तसेच सीसीटीव्ही फुटेज चेक करून गुन्ह्यात नसणारे लोक गुन्ह्यातून बाहेर काढा, अशी मागणीही जरांगे यांनी यावेळी केली.