

Only 14% of crop loans disbursed in Jalna
जालना, पुढारी वृत्तसेवा : खरीप हंगाम सुरू होऊन बराच अवधी लोटला तरी जालना जिल्ह्यात एकूण लक्ष्याच्या अवघे १४.१० टक्के पीककर्ज वाटप झाले आहे. यापूर्वी वाटप करण्यात आलेल्या पीक कर्जाची थकीत रक्कम वाढत आहे. परिणामी, बँकांकडून पीक कर्जासंदर्भात नवं जून होत नसल्याने या आकड्यात वाढ होत नसल्याचे चित्र दिसून येत आहे.
दरम्यान, चालू आठवड्याच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात खरीप पीककर्जासाठी १,३०३.०९ कोटी रुपयांचे लक्ष्य होते. मात्र प्रत्यक्षात केवळ १८३.७४ कोटी रुपये वितरित झाले. खरीप पेरणीसाठी कर्ज मे महिन्यातच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणे अपेक्षित आहे. मात्र, जूनचा तीसरा आठवडा सुरू झाला तरी बँकांची गती वाढलेली दिसत नाही.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने २४.३५ टक्के, व्यापारी बँकांनी १०.९६ टक्के तर ग्रामीण बँकांनी १६.२६ टक्केकर्ज वाटप केले आहे. पीक कर्ज वाटपाची गती वाढल्यास शेतकऱ्यांना दिलासा मिळेल.
'एनपीए' वाढले; शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत
जिल्ह्यातील बँकांकडे एकूण ३,८४८ कोटी रुपयांचे पीककर्ज थकीत असून त्यापैकी सुमारे २,६५५ कोटी रुपये नूतनीकरण व एनपीएच्या कक्षेत आहेत. जिल्ह्यातील पीककर्जाचा सरासरी एनपीए ७४ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. यात राष्ट्रीयकृत बँका ६ टक्के, महाराष्ट्र ग्रामीण बँका ९५ टक्के तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची थकीतचे प्रमाण सुमारे ८५ टक्के पर्यंत पोहचले आहे.