वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा : मराठा आरक्षण आणि सगे सोयरे अध्यादेशाची अंमलबजावणीच्या मागणीसाठी मनोज जरांगे - पाटील १७ सप्टेंबरपासून आमरण उपोषणाला बसले होते. आज (दि.२५) उपोषणाच्या नव्या दिवशी त्यांनी उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला. नारायण गडाचे महंत शिवाजी महाराज व अंतरवाली सराटी येथील महिलांच्या हस्ते सरबत पिऊन त्यांनी उपोषण स्थगित केले.
यावेळी ते म्हणाले की, उच्च न्यायालयाने निर्देश दिल्याने रात्री उपचार घेतले. आता हे उपोषण स्थगित केलेले बर राहील. सलाईन घेऊन उपोषण करण्यात अर्थ नाही. रात्री जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक मला भेटायला आले होते. कोर्टाने सांगितले की मी उपचार घ्यावेत म्हणून कोर्टाचा सन्मान म्हणून रात्री उपचार घेतले आहेत.
मला मॅनेज करण्याची ताकद कुणामध्ये नाही. विनाकारण येथे पडून तुमचे हाल करण्यात काही अर्थ नाही. आता मी तुमचे हाल करणार नाही. मी यायला सांगितले, तर १० मंत्री अर्ध्या तासात येथे येतील. ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी हे आंदोलन केले. मराठा, कुणबी एकच आहे. त्याची अंमलबजावणी करा. मराठ्यांना तुमच्यापासून दूर जाऊ देऊ नका. तुमच्या हाताने तुमची सत्ता पाडू नका.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपले नुकसान करून घेऊ नये. ही संधी सोडली तर तुमचा सगळा हिशोब करीन. मी काही राजकारणात येणार नाही. सरकारने धोका दिला, तर सत्ताधाऱ्यांना मतदान करून आपल्या जातीचा अवमान करु नका, असे आवाहन जरांगे यांनी मराठा बांधवांना केले. मी आल्यापासून जातीयवाद वाढला का? आधी नव्हता का? मग मराठ्यांच्या विरोधात माधव पँटर्न कुणी आणला होता? असा सवाल जरांगे यांनी केला.
मरेपर्यंत जातीशी गद्दारी करणार नाही. यांना कितीही माझी बदनामी करू द्या. शेतीमालाला भाव मिळण्यासाठी लढणार आहे. इतर जातींच्या आरक्षणासाठी लढणार आहे. रोज हजारो लोक येतात चिखलात उभे राहतात. याच वाईट वाटते, असे सांगून जरांगे यांना अश्रू अनावर झाले.