

No alliance in all three municipalities, tension over seat distribution continues
जालना, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीचे वारे वगात वाहू लागले आहे. राजकीय वातावरणाला चांगलाच वेग आला आहे. परतूर, अंबड आणि भोकरदन नगर परिषद निवडणुकांचा कार्यक्रम ४ ते १७नोव्हेंबरदरम्यान जाहीर झाल्याने उमेदवार, कार्यकर्ते आणि मतदारांमध्ये हालचाली वाढल्या आहेत. मात्र प्रमुख पक्षांमध्ये युती-आघाडी ठरत नसल्याने जागा वाटपाबाबत अजूनही तिढा कायम आहे. यामुळे युतीआघाडीचे गणित गुंतागुंतीचे बनले आहे.
दरम्यान, उमेदवारी अर्ज भरण्याच्या सातव्या दिवशीही शिव सेना (शिंदे गट), भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि काँग्रेस, शिवसेना उबाठा गट तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्यात अधिकृत आघाडीची घोषणा झाली
नव्हती. तथापि, परतूर नगरपालिकेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांनी एकत्र येत नगराध्यक्षपदासाठी काँग्रेसचा उमेदवार देण्याचे पत्रकार परिषदेत जाहीर केले आहे. या निर्णयामुळे स्थानिक कॉंग्रेसला उभारी मिळाल्याचे मानले जात आहे.
दरम्यान, अंबड आणि भोकरदन येथे मात्र आघाडीबाबतची अधिकृत भूमिका स्पष्ट झालेली नाही. दोन्ही ठिकाणी भाजप व शिवसेना (शिंदे गट) स्वतंत्र लढणार असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. अंबडमध्ये भाजप स्थानिक पातळीवर बळकट आहे.
भाजपाचे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष तथा आमदार नारायण कुचे यांनी मागच्या काही दिवसात माजी केंद्रीय राज्य मंत्री भागवत कराड यांची पत्रकार परिषद घेतली होती. त्यात डॉ. कराड यांनी भाजपा स्वतंत्र निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.
विशेष म्हणजे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) चे जिल्हा प्रमुख भास्कर आंबेकर यांनी नुकताच शिवसेनेचे पक्ष प्रमुख तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला. या प्रवेशामुळे समीकरणे बदलली आहेत.
शिदे गटाच्या दावाप्रतिदाव्यामुळे स्थानिक शिवसेना पक्षांतर्गत चढाओढ वाढली आहे. आंबेकर यांच्या प्रवेशामुळे शिंदे गटाला नवीन ताकद मिळाली असून परंपरागत 'उबाठा'चा प्रभाव घटल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. भोकरदनमध्येही अशीच स्थिती आहे. इथे देखील मित्र पक्षांच्या बैठका सुरू असल्या तरी अंतिम निर्णयापासून पक्ष द्रच आहेत.
स्वतंत्र लढण्याची चर्चा वाढत असून यामुळे स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. परतूर मध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट एकत्र आले आहे. इतर मित्र पक्षाची बोलणी सुरू आहे. तर अंबड आणि भोकरदनमध्ये मात्र स्थिती 'वेट अँड वॉच'ची आहे. पुढील काही दिवसांत पक्षांमध्ये निर्णायक बैठकांची शक्यता असून जागावाटपाचा तिढा सुटतो का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
कार्यकर्त्यांत चढाओढ, बंडखोरीची शक्यता
तब्बल चार ते पाच वर्षांनी निवडणूका होत असल्याने कार्यकर्त्यांत चढाओढ निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच स्थानिक पातळीवर युती करा किंवा स्वबळावर निवडणूक लढवा, असा पवित्रा घेतला होता. यामुळे भाजपा तरी स्वबळाचारा नारा घेवून निवडणूकीच्या रिंगणात उतरत आहे. तर शिंदे सेनेकडूनही महायुती झाली तर ठिक अन्यथा पर्याय खुला आहे असे सांगण्यात आले होते. तोच कित्ता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने देखील गिरवल्याने युती वा महाआघाडी होण्याची चिन्हे तशी धुसर दिसून येत आहे.