

उमरी: उमरी शहर व तालुक्यात गेल्या काही दिवसापासून गोवंश (गायी, बैल, गोरे, कारवड) चोरीला जाण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यातच नऊ जानेवारीच्या मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास गणेशनगर भागातील हनुमान मंदिर परिसरातून एका नव्या कोऱ्या सिल्वर कलरच्या कारमधून चक्क तीन गोवंश (दोन गायी व एक गोरे) चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी उमरी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेची हकीगत अशी की, दिनांक नऊ जानेवारीच्या मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास गणेशनगर भागातील हनुमान मंदिर परिसरात दोन गायी व एक गोरे (तिघांची अंदाजे किंमत 55 हजार रुपये एवढी आहे) तेथे एका सिल्वर कलरची नवी कोरी कार आली. कार मधील चार व्यक्तींनी दोन गायी व एका गोऱ्याला बांधून कारमध्ये लोटले. त्यांना लोटतांना अज्ञात चोरट्यांनी हातपाय बांधून शेपटीला ओढत कार मध्ये निर्दयीपणे मारहाण करत ढकलून कारचे दरवाजे बंद केले आणि तीनही गोवंशना घेऊन तेथून कार सुसाट वेगात निघून गेली.
हा सर्व प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला. घटनेची हकीगत उमरी पोलिसांना कळविण्यात आली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. परंतु ती कार कुणाची होती, चोरटे कोण आहेत, ती कार कोठे व कुणीकडे गेली याचा अद्यापही तपास लागलेला नाही. या प्रकरणी साहेबराव नरसिंग इंजेवाड यांनी दिलेल्या तक्रारीवरून उमरी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसापासून उमरी शहर व तालुक्यात गोवंशाची चोरी करण्याचे प्रकार वाढले आहेत. नुकतेच बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी कत्तलीसाठी जाणाऱ्या 33 गोवंशाची सुटका केली. या प्रकरणी जमादार अरविंद हैबतकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून उमरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. त्यानंतर तळेगाव येथे गोमांस पकडण्यात आले. त्या प्रकरणाचाही गुन्हा दाखल झाला. गेल्या काही दिवसापासून उमरी शहर व जुन्या उमरी भागातील अनेकांची जनावरे चोरीला जाण्याचे प्रकार वाढले आहेत. या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष घालावे अशी मागणी होत आहे. ट्रक मधून गोवंश चोरीला जात आहेत हे नवल नाही. परंतु चक्क एका नव्या कोऱ्या कार मधून गोवंश चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे. याचा तपास करण्याची मागणी जोर धरत आहे.