

वडीगोद्री : आम्हाला मनोज जरांगे यांच्या प्रकृतीची काळजी असून सरकारने लवकर निर्णय घ्यावा. सगे-सोयरेचं आश्वासन पूर्ण करावं यासाठी आम्ही आग्रही असल्याचं आमदार विजयसिंह पंडित यांनी सांगितले. ते अंतरवाली सराटी येथे माध्यमांशी बोलत होते. आज पंडित यांनी मनोज जरांगे यांची भेट घेऊन त्यांच्या तब्बेतीची विचारपूस केली.
जरांगे यांना उपोषणाला बसण्याची वेळ येऊ नये अशी भुमिका सरकारकडे मांडणार असून उपोषणाचा विषय मार्गी लावण्यासाठी माझा प्रयत्न असणार असल्याचं आमदार पंडित म्हणाले. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा विषय राजकीय असून त्यांचा राजीनामा घ्यायचा की नाही हा वरिष्ठ पातळीवरचा विषय आहे. बीडचा बिहार होतोय त्याला पायबंद घातला पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली. संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे असंही पंडित यावेळी म्हणाले. दरम्यान जरांगे यांच्या भेटीनंतर आमदार विजयसिंह पंडित यांनी सामूहिक उपोषणात बसलेल्या उपोषणकर्त्यांची देखील भेट घेतली.
राष्ट्रवादी काँगेस शरद पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी जरांगे यांच्या तब्बेतीची विचारपूस करत काळजी घेण्याचं आवाहन केलं. धनंजय मुंडेंकडे असलेल्या मंत्रिपदामुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना संरक्षण आणि व्हीआयपी ट्रिटमेंट दिली जात असल्याचा आरोप क्षीरसागर यांनी केला. मनोज जरांगेंनी सरकारकडे बोलण्याची जबाबदारी द्यावी आम्ही जबाबदारी पार पाडू असंही यावेळी आ.संदीप क्षीरसागर म्हणाले.