

Mercury hits 42 degrees; citizens distressed by heatwave
जालना, पुढारी वृत्तसेवा : भारतीय हवामान विभागाच्या सूचनेनुसार जालना जिल्ह्यासाठी १२ ते १५ मे पर्यंत येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. याचाच परिणाम, गुरूवार दि. १४ रोजी जालना शहरावर जाणवला. जालना शहराचा पारा सुमारे ४२ अंशावर गेल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या वाढत्या उष्णतेच्या लाटेने नागरिक हैराण झाले आहेत.
गुरूवारी सकाळपासूनच जालना शहरातील हवामान अत्यंत उष्ण होते. कमाल तापमान दिवसा अंदाजे ४१ ते ४२ पर्यंत गेले होते. यामुळे नागरिकांना उष्माघातापासून बचावाचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. दुपारी १२ ते सायंकाळी ४ या वेळेत तापमानात मोठी वाढ होण्याची शक्यता असून नागरिकांनी अत्यावश्यक कामांशिवाय घराबाहेर पडणे टाळावे. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला तसेच मैदानी काम करणाऱ्या कामगारांनी अधिक दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
काय घ्यावी काळजी?
नागरिकांनी उष्माघात टाळण्यासाठी पुरेसे पाणी पिणे, तहान नसली तरी नियमित पाणी सेवन करणे आणि फळांचे रस, ओआरएस, लिंबूपाणी, ताक यांसारख्या द्रव पदार्थांचा आहारात समावेश करावा. तसेच बाहेर पडताना डोक्यावर टोपी, गमछा किंवा छत्रीचा वापर करावा तसेच हलक्या रंगाचे, सैल व सुती कपडे परिधान करावेत.
उन्हात काम करणाऱ्या व्यक्तींनी शक्यतो सावलीत विश्रांती घ्यावी. कामाच्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी तसेच मधून-मधून विश्रांती घेऊन शरीराचे तापमान नियंत्रित ठेवावे, असा सल्लाही देण्यात आला आहे. दुपारच्या सुमारास शक्यतो कष्टाची कामे टाळावीत.
आपत्कालीन १०४ वर संपर्क साधावा
चक्कर येणे, डोकेदुखी, अशक्तपणा, जास्त घाम येणे किंवा घाम अचानक बंद होणे, त्वचा लाल होणे, उलटी होणे, श्वास घेण्यास त्रास होणे अशी लक्षणे दिसल्यास तात्काळ वैद्यकीय मदत घ्यावी. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी जिल्हा सामान्य रुग्णालय, येथे मो. ९४०४५४८३१७ संपर्क साधावा. आरोग्य विभाग जिल्हा परिषद जालनाच्या टोल फ्रि क्रमांक १०४ वर संपर्क साधून नजीकच्या शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा.