

Maintain the discipline and peace of Ganeshotsav right up to the immersion procession
जालना, पुढारी वृत्तसेवा : गणेशोत्सवाची शांतता व शिस्त विसर्जन मिरवणुकीपर्यंत कायम ठेवण्याचे अवाहन पोलिस अधीक्षक तेगबीरसिंह संधु यांनी केले. जालना शहरात सुरू असलेल्या गणेशोत्सवा दरम्यान पोलिस अधीक्षक तेगबीर सिंह संधू यांनी शुक्रवार (१८) रोजी रात्री श्री गणेश महासंघाला सदिच्छा भेट दिली.
याप्रसंगी त्यांच्या हस्ते जालन्यातील पहिली सार्वजनिक आरती झाली. याप्रसंगी उपस्थितांना ते बोलत होते. संधू पुढे म्हणाले की, जालना शहरात गणेशोत्सवाची सुरुवात पारंपरिक आणि शिस्तबद्ध पद्धतीने झाली आहे. मामा चौकातून निघणारी विसर्जन मिरवणूक आणि संपूर्ण उत्सव पारंपरिक व शिस्तबद्ध मार्गान पार पडून जालना शहर संपूर्ण राज्यासमोर एक आदर्श घालून देईल, असा विश्वास तेगबीर सिंह संधू यांनी व्यक्त केला.
श्री गणेश महासंघाच्यावतीने श्री विसर्जन मिरवणुकीचा शुभारंभ मामा चौकात करण्यात येऊन सर्व गणेश मंडळाच्या अध्यक्षांचा सत्कार करण्यात येतो. यापूर्वी उत्कृष्ट, शिस्तप्रिय व पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांना 'आयजी शील्ड' देण्याची परंपरा होती, हे निदर्शनास आणून दिले., या परंपरेचे पुनरुज्जीवन करण्यासाठी विशेष पोलीस महानिरीक्षकांशी चर्चा करु असे ते म्हणाले.
शिस्त वाखणण्याजोगी
जालन्यातील गणेशोत्सवाची भव्य परंपरा पाहता, सर्व नागरिक व गणेश मंडळांनी एकत्र येऊन सलोखा, शांतता आणि कायदा-सुव्यवस्थेचे पालन करत हा पावन सण साजरा करावा. जालना शहरात माझी ही पहिलीच गणेश आरती असून, येथील गणेश मंडळांचा उत्साह व शिस्त वाखाणण्याजोगी आहे, असे पोलिस अधिक्षक संधू म्हणाले.