

पिंपळगाव रेणुकाई : तालुक्यातील ग्रामीण भागात डीजे व नेत्यांच्या प्रतीक्षेत अनेक ठिकाणी लग्नाचे मुहूर्त कागदावरच राहात असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. दरम्यान बाहेरगावाहून आलेल्या वऱ्हाडींनाही पुन्हा आपल्या गावी जावयाचे असल्याने त्यांची अडचण होताना दिसत आहे.
तालुक्यातील ग्रामीण भागात सध्या लग्नसराई जोरात सुरू असून अनेक ठिकाणी दुपारचे लग्न डीजे व नेत्यांच्या प्रतीक्षेत रात्री उशिराने लागत आहेत. यामुळे कडक उन्हात लग्नास आलेल्या वऱ्हाडी मंडळी आणि पाहुण्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
लग्नापूर्वी काढण्यात येणाऱ्या वरातीमध्ये डीजेच्या तालावर युवावर्ग बेधुंद होऊन नाचत असल्याने लग्नाच्या मुहूर्ताकडे दुर्लक्ष होत आहे. लग्नातील संस्कार व संकल्पना या सर्व गोष्टींमुळे काहीशी मागे पडत आहे. अनेक लग्नात लग्न समारंभाऐवजी फोटो सेशनकडे वधू व वरांकडून अधिक लक्ष व वेळ दिला जात असल्याने लग्न विधी शॉर्टकटमध्ये उरकले जात आहेत.
एवढे सर्व सोपस्कार करून वधू- वर मांडवात पोहोचल्यानंतर नेत्यांच्या आगमनाची प्रतीक्षा व सत्कारामध्ये अनेक तास उलटून जात असल्याने लग्नासाठी आलेल्या वऱ्हाडींना मनस्ताप सहन करावा लागत आहे. एकीकडे तापमानाचा पारा वाढत असतानाच अनेक ठिकाणी उघड्या मंडपात बसलेल्या वऱ्हाडींना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागत आहे. अनेक गावांत पिण्याच्या पाण्यासह सावली आणि लग्नास आलेल्या वऱ्हाडींसाठी बसण्याची पुरेशी व्यवस्था नसल्याने त्यांच्या अडचणीत वाढ होत आहे.
लग्नासाठी आलेले शेकडो लोकांची या सर्व प्रकारामुळे अडचण होत आहे. लग्नाच्या वेळेस पाहुणे मंडळीचे स्वागत करण्याऐवजी नेत्यांना महत्त्व दिले जात आहे. यामुळे उपस्थितांमध्ये संतापाची भावना निर्माण होताना दिसत आहे. याचा सर्वाधिक त्रास लहान मुले, वृद्ध आणि महिलांना सहन करावा लागत आहे. लग्नाच्या वेळेस करण्यात येणारे धार्मिक विधी व सोपस्कारासह लग्न मुहूर्त कागदावरच राहत असून पारंपरिक रितीरिवाजापेक्षा दिखावूपणा व बडेजाव याला महत्त्व आले असल्याचे दिसत आहे.
लग्न हा संस्कार आहे, सोहळा नाही. सत्कार आणि डीजेच्या गोंधळात शुभमुहूर्त टळतो, पाहुण्यांचा वेळ वाया जातो. या अनावश्यक खर्चाला फाटा देऊन लग्न वेळेत लावणे हीच खरी सामाजिक जबाबदारी आहे. वेळेचे भान जपुया, परंपरेला मान देण्यात यावे.
— कृष्णा बेराड, सामाजिक कार्यकर्ते