

जालना : शेतातील पाण्याच्या पाईपलाईनच्या वादातून झालेल्या खूनप्रकरणी जालना जिल्हा व सत्र न्यायालयाने चार आरोपींना जन्मठेपेची शिक्षा तसेच प्रत्येक आरोपीस दहा हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. दंड न भरल्यास दोन वर्षांचा साधा कारावास भोगण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
परतूर तालुक्यातील आंबा येथे ०८ ऑगस्ट २०२३ रोजी रात्री कृष्णा घोंगडे हे मेडिकल दुकान बंद करून घरी जात असताना शेताच्या तसेच पाण्याच्या पाईपलाईनच्या वादातून आरोपींनी त्यांच्यावर हल्ला केला. कृष्णा यास काठी, कोयता व इतर हत्यारांनी गंभीर मारहाण करून त्यांचा खून करण्यात आला. या घटनेनंतर फिर्यादी सागर गुणाजी घोंगडे यांच्या तक्रारीवरून परतूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान साक्षीदारांचे जबाब, वैद्यकीय अहवाल आणि इतर पुरावे न्यायालयासमोर सादर करण्यात आले.
सरकार पक्षाच्या वतीने अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अॅड. जयश्री नारायण बोराडे यांनी युक्तिवाद केला. या खटल्यात १७ साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली होती. सदर पुरावे व युक्तिवाद ग्राह्य धरत अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश-०२, जालना यांनी आरोपी शंकर दगडुबा पतंगे, पांडुरंग नरहरी रोकडे, पवन नरहरी रोकडे, व नरहरी बापुराव रोकडे यांना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.