

Kedareshwar Temple Mantha Taluka shravan Month devotees
मंठा, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील केदार वाकडी येथे दुधना नदीच्या तीरावर वसलेले केदारेश्वर मंदिर हे भाविकांच्या श्रद्धेचे प्रमुख केंद्र आहे. जुनी आख्यायिका सांगते की, इ.स. २००८ पूर्वी येथे दैवल ऋषी आपल्या शिष्यांसह वास्तव्यास होते. श्रीराम अवतारकाळात त्यांनीच केदारेश्वराची पिंड स्थापून पूजा सुरू केली. त्यांच्या नावावरून जवळच्या देवला गावाचे नाव पडले असल्याचे मानले जाते.
२००८ मध्ये गावाचे पुनर्वसन झाले आणि दुधना धरणामुळे जुन्या मंदिराचा काही भाग पाण्यात गेला. त्यानंतर ग्रामस्थांनी नवीन पिंड आणून मंदिराची पुनर्बाधणी केली. श्रावण आणि माघ महिन्यात या ठिकाणाला विशेष महत्त्व असून, मंठा, परतूर, घनसावंगी, अंबड, सेलू, जिंतूर, पाथरी तसेच विदर्भातील लोणार, मेहकर आदी भागांतून भाविक येथे दर्शनासाठी येतात.
श्रावणात दर सोमवारी पालखी सोहळा काढला जातो. गाव सजवून रांगोळ्या काढल्या जातात आणि दररोज बिल्वार्चन, अभिषेक तसेच अन्नदानाची जुनी परंपरा पाळली जाते. श्रावण शुद्ध प्रतिपदेपासून भाद्रपद शुद्ध प्रतिपदेपर्यंत दरर ोज एक गावकरी महाप्रसादाचा मान सांभाळतो.
या दिवसांत मंदिर परिसर यात्रेच्या उत्साहाने गजबजतो. निसर्गरम्य वातावरण, रस्त्याच्या कडेला असलेली अशोकाची झाडी, आणि दोन किलोमीटर अंतरावरील निम्न दुधना धरण हे पर्यटकांचे आकर्षण ठरते. सेलू-सातोणा फाट्यापासून येणाऱ्या रस्त्यांची दयनीय अवस्था भक्तांसाठी त्रासदायक ठरत आहे. माघ महिन्यात दररोज लघुरुद्राभिषेक आणि अन्नदानाचे आयोजन केले जाते. महाशिवरात्रीला येथे मोठी यात्रा भरते. गावातील लोक बाहेर नोकरी-व्यवसायानिमित्त असले तरी या सोहळ्यात हजेरी लावणे टाळत नाहीत.
श्रद्धा आणि परंपरांचा संगम
श्रद्धा, परंपरा आणि निसर्ग यांचा संगम अस-लेले केदारेश्वर मंदिर हे केवळ धार्मिक नव्हे तर पर्यटनाच्या दृष्टीनेही महत्त्वाचे ठिकाण असून, रस्त्यांची दुरुस्ती व सोयीसुविधा वाढवल्यास येथे भाविकांची संख्या आणखी वाढेल, अशी अपेक्षा स्थानिक भक्तांनी व्यक्त केली आहे.