

जालना ः देशातील शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त करणारा भारत-अमेरिका कृषी करार तात्काळ रद्द करण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी जालना जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने एकदिवसीय सत्याग्रह आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते.
या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सोमवार, दि. 20 रोजी सकाळी 11 वाजता जालना येथील शासकीय विश्रामगृहात नवनियुक्त प्रभारी व पदाधिकाऱ्यांचा सत्कार तसेच महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यानंतर दुपारी 1 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सत्याग्रह आंदोलन करण्यात आले.
भारत आणि अमेरिकेतील शेती उत्पादन खर्चातील मोठा फरक लक्षात घेता, भविष्यात मक्का पिकाचे दर 800 रुपये प्रति क्विंटलपर्यंत घसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत भारतीय शेतकऱ्यांवर गंभीर आर्थिक परिणाम होऊ शकतो, असा इशारा जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष राहुल देशमुख यांनी दिला. या प्रसंगी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आमेर अब्दुल सलीम, सरचिटणीस विश्वदीप पडोळ, मोहित जाधव, रऊफ परशुवाले, बदर चाऊस, आदी उपस्थित होते.
तर तीव्र आंदोलन उभारू ः देशमुख
शेतकऱ्यांनी येणाऱ्या संकटाची जाणीव ठेवून मक्का 800 रुपये क्विंटल दराने विकण्याची मानसिकता तयार ठेवावी. अन्यथा या अन्यायकारक कराराविरोधात तीव्र आंदोलन उभारावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. तसेच, शेतकरी हिताच्या या अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नावर केंद्र सरकारने तात्काळ निर्णय घेऊन हा करार रद्द करावा, अशी मागणी त्यांनी केली.