

जालना : जालना शहरातील प्रभाग क्रमांक १० मधील शिषटेकडी परिसरात सध्या घाणीचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे स्थानिक रहिवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. महानगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे कचऱ्याचे ढिगारे साचले असून, नाल्यांची नियमित साफसफाई होत नसल्याने परिसरात अस्वच्छता पसरली आहे.
दरम्यान, येथील नाल्यांमध्ये साचलेल्या घाणीमुळे डासांचे प्रमाण वाढले असून साथीच्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना विशेषतः याचा त्रास सहन करावा लागत आहे.
नुकतेच निवडून आलेले चारही नगरसेवक या भागात फिरकत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. "आम्ही मतदान करून प्रतिनिधी निवडले, पण आमच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष होत आहे. पुढील पाच वर्षे असाच त्रास सहन करावा लागणार का?" असा संतप्त सवाल स्थानिकांकडून उपस्थित केला जात आहे.
या सर्व समस्यांकडे महानगरपालिका प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन शिषटेकडी परिसरातील कचरा त्वरित उचलण्याचे आदेश द्यावे, अशी मागणी मागणी नागरिकांनी केली आहे. शहर स्वच्छतेच्या घोषणा आणि प्रत्यक्षातील परिस्थिती यात मोठी तफावत दिसून येत असून, संबंधित अधिकाऱ्यांनी आता तरी जागे होऊन कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.