

जालना : जालना जिल्ह्यात सर्पदंशांच्या घटनांमध्ये यंदा लक्षणीय घट झाल्याचे जिल्हा आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. २०२५ मध्ये जिल्ह्यात ४० सर्पदंशांच्या घटना नोंदवल्या गेल्या होत्या. त्यापैकी ५ रुग्णांचा मृत्यू (एस फॉर्म) झाला होता, तर ३५ रुग्णांवर यशस्वी उपचार (पी फॉर्म) करण्यात आले होते. याउलट २०२६ मध्ये जानेवारी ते जुलैअखेरपर्यंत केवळ ९ घटना नोंदल्या गेल्या असून, त्यामध्ये २ जणांचा मृत्यू आणि ७ रुग्ण उपचारानंतर बरे झाल्याची नोंद आहे.
२०२५ मध्ये सर्वाधिक १८ सर्पदंशांच्या घटना भोकरदन तालुक्यात घडल्या होत्या. त्याखालोखाल जालना तालुक्यात ५, मंठा तालुक्यात ४, अंबड, घनसावंगी आणि परतूर तालुक्यात प्रत्येकी ३, जाफराबादमध्ये २ तर बदनापूरमध्ये १ घटना नोंदविण्यात आली होती. मृत्यूच्या घटनांमध्ये मंठा तालुक्यात सर्वाधिक ४, तर घनसावंगी तालुक्यात १ मृत्यूची नोंद झाली होती.
दरम्यान, २०२६ मध्ये आतापर्यंत भोकरदन तालुक्यात २ घटना नोंदल्या असून त्यामध्ये १ मृत्यू व १ रुग्ण उपचारानंतर बरा झाला आहे. अंबडमध्ये ३ रुग्ण, परतूरमध्ये २, तर घनसावंगीमध्ये १ रुग्ण उपचारानंतर बरा झाला आहे. जालना तालुक्यात एका रुग्णाचा मृत्यू झाला असून इतर तालुक्यांमध्ये यंदा सर्पदंशाची घटना नोंदलेली नाही.
पावसाळ्यात शेतातील कामे, गवत कापणी तसेच साचलेल्या पाण्यामुळे सापांचा वावर वाढत असल्याने ग्रामीण भागात विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. शेतात काम करताना गमबूट किंवा जाड पादत्राणे वापरणे, रात्री टॉर्चचा वापर करणे, घराच्या परिसरात स्वच्छता राखणे आणि सर्पदंश झाल्यास कोणतेही पारंपरिक उपचार न करता तातडीने जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल होणे आवश्यक असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले आहे.
यंदा सर्पदंशाच्या घटनांमध्ये लक्षणीय घट झाली असली तरी पावसाळ्याचा कालावधी अद्याप सुरू असल्याने नागरिकांनी सतर्क राहून आवश्यक ती काळजी घेण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.
सर्पदंश झाल्यास बुवाबाजी न करता रुग्णालयात उपचार घेणे हाच सुरक्षित उपाय असल्याने सर्पदंश झाल्यास तातडीने रुग्णास जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करावे. जिल्ह्यात सर्पदंशावरील इंजेक्शन ए.एस.व्ही उपलब्ध असून ते मोफत देण्यात येते.
जयश्री भुसारे, जिल्हा आरोग्य अधिकारी