

जालना, पुढारी वृत्तसेवा ः सारवाडी ते कोडी रेल्वे स्थानकादरम्यान पटरीवर ट्रक बंद पडला. हा ट्रक येथेच उभा करुन ट्रक चालकाने पळ काढल्याची घटना शुक्रवारी दुपारी साडे तीन वाजेच्या सुमारास घडली. मुंबईहून नांदेडकडे जाणारी तपोवन एक्सप्रेस याच वेळी येत होती. रेल्वे चालकाच्या हा प्रकार लक्षात आल्याने त्याने तातडीने ब्रेक दाबून ट्रक पासून शंभर फूट अंतरावर रेल्वे थांबविल्याने मोठी दुर्घटना टळली.
सारवाडीजवळ विना सुरक्षा रक्षक असणारे गेट आहे. रेल्वे रूळ ओलांडतांना वाहनधारकाला काळजी घ्यावी लागते. दुपारी तीनच्या सुमारास मात्र सारवाडीजवळ बांधकामाचे साहित्य टाकून ट्रक (एमएच 21, डी 9275) सुसाट निघाला. नेमका पटरीवरच बंद पडला. या वेळी तपोवन एक्सप्रेस येत होती. रेल्वे चालकाने ट्रक पटरीवर उभा असल्याचे पाहिल्यावर त्याने अर्जंट ब्रेक दाबले. त्यामुळे रेल्वे ट्रकपासून काही अंतरावर थांबली.अचानक रेल्वे थांबवल्याने रेल्वेतील प्रवासी खाली उतरले.
दरम्यानच्या काळात ट्रक चालक घटनास्थळावरुन फरार झाल्याने प्रवाशांनी ट्रक रेल्वे पटरीवरुन ढकलत तेथून हलविला. 45 मिनिटानंतर रेल्वे नांदेडकडे रवाना झाली. रेल्वे पोलिस दलाचे निरीक्षक पवन इंगळे, उपनिरीक्षक विजय वाघ हे तातडीने घटनास्थळी आले. पोलिसांना ट्रक चालक सापडू न शकल्याने ट्रक नेमका पटरीवर का थांबला हे कळू शकले नाही. हा घातपाताचा प्रकार आहे का या दिशेनही पोलिस तपास करीत आहेत.अनेक प्रवाशांनी रेल्वे चालकाने दाखविलेल्या समयसूचकतेबद्दल आनंद व्यक्त केला. रेल्वे ट्रकला धडकली असती तर मोठी दुर्घटना झाली असती, असे प्रवाशांनी सांगितले.