

जालना : शहर महानगरपालिकेने जीर्ण व धोकादायक इमारती हटविण्याच्या मोहिमेला आजपासून वेग दिला असून, छत्रपती संभाजी महाराज उद्यान परिसरातील मोडकळीस आलेली मनपाची इमारत जेसीबीच्या सहाय्याने जमीनदोस्त करण्यात आली. या कारवाईमुळे परिसरातील संभाव्य अपघाताचा धोका टळला आहे.
शहरातील सर्व जीर्ण व अपघातास कारणीभूत ठरणाऱ्या इमारती तातडीने हटविण्याचे आदेश प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिले होते. त्यानुसार मालमत्ता विभागाने आज प्रत्यक्ष कारवाईची सुरुवात केली. महानगरपालिकेच्या मालकीच्या इतरही अनेक ठिकाणी अशा मोडकळीस आलेल्या इमारती असून त्यांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे.
काही मालमत्ता निवृत्त किंवा विद्यमान कर्मचाऱ्यांच्या ताब्यात असल्याचेही निदर्शनास आले असून, त्या लवकरच मनपाच्या ताब्यात घेतल्या जाणार आहेत. ही कारवाई अतिरिक्त आयुक्त अर्जुन गिराम यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता व कर विभागप्रमुख राहुल देशमुख आणि त्यांच्या पथकाने पार पाडली.